कोरोनातून बरे झालेल्यांच्या संख्येने भारतात ५१ लाखांचा आकडा पार केला आहे. मात्र अद्यापही मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका असल्याचे भारतीय वैद्यक संशोधन परिषदेने (आयसीएमआर) केलेल्या दुसऱ्या सिरो अहवालातून समोर आले आहे. ऑगस्टपर्यंत नोंद झालेल्या प्रत्येक रुग्णाद्वारे किमान २६ ते ३२ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळले आहे. त्यामुळे कोरोनाच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येणारे सण आणि हिवाळा लक्षात घेता राज्यांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन आयसीएमआरकडून करण्यात आले आहे.
भारतात दहा लाख लोकसंख्येमागे ४४५३ कोरोना रुग्ण आढळत आहेत तर ७० जणांचा मृत्यू होत आहे. गेल्या सात दिवसात भारतात दहा लाख लोकसंख्येमागे ४२५ नव्या रुग्णांची नोंद झाली. आयसीएमआर आणि खाजगी क्षेत्राच्या प्रयत्नाने भारताने दहा लाख लोकसंख्येमागे ५० हजारपेक्षा जास्त चाचण्या करण्याचा टप्पा गाठला आहे. प्रती दिवशी १५ लाख चाचण्या करण्याची क्षमता भारताने प्राप्त केली आहे. आतापर्यंत ७ कोटी ३० लाखांपेक्षा जास्त चाचण्या करण्यात आल्या आहेत. गेल्या आठवड्यात ७७.८ लाख चाचण्या केल्या आहेत. मोठ्या प्रमाणात होत असलेल्या चाचण्या आणि सिरोने केलेल्या सर्व्हेक्षणातून ऑगस्टपर्यंत नोंद झालेल्या प्रत्येक रुग्णाद्वारे २६ ते ३२ जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळले आहे. तसेच सोसायट्यांच्या तुलनेत झोपडपट्ट्यांमधील धोका दुप्पट आहे. झोपडपट्ट्यांमधील कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण हे ग्रामीण भागातील फैलावापेक्षा चौपट आहे. त्यामुळे झोपडपट्टी भागामध्ये अधिक काळजी घेणे अपेक्षित आहे. त्यासाठी लॉकडाऊन, प्रतिबंधित क्षेत्र अशा विविध पर्यायांचा वापर करण्याच्या सूचना आयसीएमआरकडून देण्यात आल्या आहेत.
सध्या नव्या रुग्णापेक्षा बऱ्या झालेल्यांची संख्या जास्त असल्याचे राष्ट्रीय आलेखाच्या विश्लेषणात आढळून आले आहे. १५ सप्टेंबरपासूनच्या आकडेवारीचे विश्लेषण केले असता सक्रीय रुग्णांच्या टक्केवारीत घट तर बरे झालेल्यांच्या टक्केवारीत वाढ दिसून येत आहे. सध्या १५.४ टक्के सक्रीय रुग्ण आहेत तर ८३.०१ टक्के बरे झाले आहेत. महाराष्ट्रातही दैनंदिन सरासरी नव्या रुग्ण संख्येत घट झाली आहे.