दिल्ली विमानतळावर प्रवाशांची वाढती गर्दी पाहता विमान कंपन्यांनी आपल्या नियमांत मोठे बदल केले आहेत. इंडिगो एअरलाईननंतर आता एअर इंडियानेही प्रवाशांना देशांतर्गत विमान उड्डाण करण्याआधीच्या (टेकऑफ) साडे तीन तास आधी दिल्ली विमानतळावर पोहोचण्यास सांगितले आहे. विमानतळावर प्रचंड गर्दी होत असल्याने विमान वाहतूक मंत्रालयाने कडक भूमिका घेत विमान कंपन्यांनी हा बदल केला आहे. त्याचवेळी विस्ताराने प्रवाशांना फ्लाइटच्या 3 तास आधी पोहोचण्याचा सल्ला दिला आहे.
दिल्ली विमानतळावर प्रवाशांची वाढती गर्दी कमी करण्यासाठी आणि प्रवाशांच्या सोयीसाठी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने मंगळवारी विमान कंपन्यांसाठी या नव्या गाइडलाइन्स जारी केल्या आहेत. यामध्ये चेक-इन आणि बॅगेज ड्रॉप काउंटरवर कर्मचाऱ्यांच्या तैनातीपासून फ्लाइट पकडण्याच्या वेळेपर्यंत अनेक बदल करण्यात आले आहेत.
संसदीय समितीने DIAL चे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) यांच्याशी गर्दीमुळे प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल चर्चा केली होती. गर्दीमुळे प्रवाशांना दिल्ली विमानतळावर दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागली. यासंदर्भात 15 डिसेंबरलाही बैठक होणार आहे.
याआधी मंगळवारी देशातील सर्वात मोठी एअरलाइन इंडिगोने प्रवाशांना देशांतर्गत उड्डाणांसाठी निर्धारित वेळेच्या 3.5 तास आधी दिल्ली विमानतळावर पोहोचण्यास सांगितले होते. दरम्यान इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर (IGIA) गेल्या आठवड्यात वाढत्या हवाई वाहतुकीच्यादरम्यान लांब रांगा आणि गर्दी दिसून येत आहे. पीक अवर्समध्ये फ्लाइट्सची संख्या कमी करण्यासह परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी अधिकाऱ्यांनी कृती आराखडा तयार केला आहे. केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनीही सोमवारी येथील विमानतळावरील व्यवस्थेची पाहणी केली.
इंडिगोने सांगितले की, “सुरक्षा तपासणीसाठी फक्त सात किलो वजनाची एक हँड बॅगेज घेऊन जाण्याची विनंती केली आहे. याशिवाय प्रवाशांना त्यांचे वेब चेक-इन पूर्ण करण्यास सांगितले आहे. विमानतळ टर्मिनल्सवर प्रवाशांच्या प्रचंड गर्दीचा हवाला देऊन, स्पाईसजेटने प्रवाशांना लवकर पोहोचण्याचा आणि सात किलोग्रॅमपर्यंत फक्त एकच कॅरी बॅगेज घेऊन जाण्याचा सल्ला दिला आहे. एकापेक्षा जास्त हाताची बॅग घेऊन नका, असाही सल्ला दिला आहे.
दिल्ली विमानतळाबाबत स्पाईसजेटने सांगितले की, प्रवाशांच्या मोठ्या संख्येमुळे चेक-इन आणि बोर्डिंगला सामान्यपेक्षा जास्त वेळ लागण्याची अपेक्षा आहे. मुंबई विमानतळाच्या संदर्भात, स्पाईसजेटने देशांतर्गत उड्डाणांसाठी प्रवाशांना टेकऑफच्या 2.5 तास आधी आणि आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी 3.5 तास आधी पोहचण्याचा असा सल्ला दिला आहे. मंगळवारीही अनेक प्रवाशांनी सोशल मीडियावर दिल्ली विमानतळावर गोंधळ आणि तासनतास वाट पाहत असल्याच्या तक्रारी केल्या होत्या.