बिहारच्या वैशाली जिल्ह्यातील महनार – हाजीपूर हायवेवर रविवारी रात्री एक भरधाव अनियंत्रित ट्रकने अनेकांना चिरडल्याची घटना घडली आहे.रविवारी रात्री झालेल्या या भीषण अपघातात 15 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये सहा लहान मुलांचा समावेश आहे. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी ट्रक चालकाला बेदम मारहाण केली.
या भीषण घटनेवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री नितीश कुमार, उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आणि इतर नेत्यांनीही शोक व्यक्त केला आहे. यानंतर पंतप्रधान मोदींनी या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना PMNRF (पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी) मधून 50,000 रुपयांची मदत मंजूर केली आहे, असे PMO ने सांगितले. घटनेत काही जण गंभीररित्या जखमी झाले असून त्यांच्यावर हाजीपूरच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
The accident in Vaishali, Bihar is saddening. Condolences to the bereaved families. May the injured recover soon. An ex-gratia of Rs. 2 lakh from PMNRF would be given to the next of kin of each deceased. The injured would be given Rs. 50,000: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) November 20, 2022
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बिहारमधील राष्ट्रीय महामार्ग 122 बीवरील नयागाव 28 टोलाजवळ रात्री 8.30 च्या सुमारास घडली. यावेळी रस्त्याच्या कडेला असलेल्या स्मशानभूमीजवळील पिंपळाच्या झाडाजवळ भुईं बाबाच्या पूजेचा कार्यक्रम सुरु होता. या पूजेसाठी हजारो लोकांची गर्दी जमली होती. यावेळी हाजीपूरच्या दिशेने भरधाव वेगात येणार अनियंत्रित ट्रक या गर्दीत घुसला आणि काही समजण्याच्या आतच डझनभर लोकांना चिरडले. यानंतर ट्रक झाडावर जाऊन आदळला. या अपघातात 6 लहान मुलांसह 15 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेतील ट्रक चालक नशेत होता, असे स्थानिकांनी सांगितले.
Prime Minister Narendra Modi has sanctioned ex-gratia of Rs 2 lakhs each for the next of kin of persons who lost their lives in the accident in Vaishali, Bihar and Rs 50,000 to the injured from PMNRF (Prime Minister’s National Relief Fund): Prime Minister’s Office pic.twitter.com/0MH5XC3RKy
— ANI (@ANI) November 20, 2022
या अपघातानंतर हजारो लोक घटनास्थळी जमा झाले. यात अनेक संतप्त लोकांनी हाजीपूर-महानर मुख्य रस्ता रोखून धरत प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. सुमारे डझनभर रुग्णवाहिकांनी अपघातातील जखमी आणि मृतांना घटनास्थळावरून जवळच्या रुग्णालयात नेले. यावेळी रस्त्यावर ठिकठिकाणी रक्ताचे लोट वाहताना दिसले, हे दृश्य पाहून सगळेच हैराण झाले. यातील अर्धा डझन गंभीर जखमींना प्राथमिक उपचारांसाठी हाजीपूर सदर रुग्णालयात तर तिघांना पीएमसीएचमध्ये पाठवण्यात आले आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.