नवी दिल्ली : उमेश पाल अपहरण प्रकरणी मुख्य आरोपी असलेल्या अतिक अहमदची (atiq ahmad) शनिवारी हत्या करण्यात आली असून त्याचा भाऊ अशरफचीसुद्धा (Ashraf) त्याचवेळी हत्या करण्यात आली. अतिक आणि अशरफच्या हत्येनंतर भारतीय जनता पक्षाचे नेते तेजिंदर पाल सिंह बग्गा यांचे ट्वीट चर्चेत आले आहे. तेजिंदर पाल सिंह यांनी 18 दिवसांपूर्वी केले होते ट्वीट.
2006 मध्ये उमेश पाल यांचे बंदुकीच्या धाकावर माफिया अतिक आणि त्याचा भाऊ अशरफ यांनी अपहरण केल्यामुळे या दोघांविरुद्ध 2007 मध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दोघांना युपी एटीएसने अटक केली. त्यांना शनिवारी (15 एप्रिल) वैद्यकीय तपासणीसाठी कोल्विन रुग्णालयात नेत असताना अज्ञातांनी पोलिसांच्या ताफ्यावर गोळीबार केली आणि यात दोघांचा मृत्यू झाला आहे. गोळीबार करणाऱ्यांनी हल्ल्यानंतर लगेचच आत्मसमर्पण केले आहे. अतिक आणि अशरफच्या हत्येनंतर भारतीय जनता पक्षाचे नेते तेजिंदर पाल सिंह बग्गा यांच्या एका ट्विटची चर्चा सुरू झाली आहे.
i already warned. Next time media shouldn’t be allowed with Gangsters pic.twitter.com/Jn1Zf42KDA
— Tajinder Pal Singh Bagga (@TajinderBagga) April 15, 2023
बग्गा यांनी २८ मार्चला एक ट्विट करताना त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना टॅग केले होते. त्यांनी ट्विटरमध्ये म्हटले होते की, ‘हाय प्रोफाईल आरोपींना घेऊन जाणाऱ्या पोलिसांच्या ताफ्यासोबत माध्यमांना परवानगी देण्यात येऊ नये. उद्या एखादा गँगस्टर माध्यम प्रतिनिधी बनून त्या आरोपींना गोळ्या झाडू शकतो.’ उमेश पाल हत्या प्रकरणात अतिक अहमदला प्रयागराज न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यासाठी त्याला गुजरातच्या साबरमती तुरुंगातून प्रयागराजला रोड मार्गांने नेण्यात आले होते. त्यावेळी मिडियाच्या गाड्या पोलिसांच्या ताफ्यासोबत मागून प्रवास करत होत्या. ती परिस्थिती पाहून बग्गा यांनी ट्विट केले होते आणि त्यांनी वर्तवलेली शक्यता अगदी तंतोतंत खरी ठरल्यामुळे त्यांचे ट्विट चर्चेचा विषय ठरले आहे.
दोनच दिवसांपूर्वी अतिकचा मुलगा असदला पोलीस एन्काऊंटरमध्ये मारले होते. धूमनगंजमध्ये २४ फेब्रुवारीला उमेश पाल आणि त्याच्या दोन सुरक्षारक्षकांची हत्या करण्यात आली होती. या हत्येवेळी सीसीटीव्ही फुटेजमध्ये अतिकचा मुलगा असद, गुड्डू मुस्लिम, गुलाम, साबिर, अरबाज आणि विजय उर्फ उस्मान चौधरी दिसून आले होते. त्यानंतर पोलिसांनी अतिकच्या गँगविरोधात कडक पावले उचलण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे अतिक अहमदने 44 वर्षांमध्ये उभारलेले साम्राज्य गेल्या बिहार पोलिसांनी ५१ दिवसांमध्ये संपवले आहे.
हल्ला करणारे माध्यमांचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित
शनिवारी (१५ एप्रिल) रात्री दहा सुमारास अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ या दोघांना पोलिसांनी प्रयागराजमधील रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेल होते. यावेळी माध्यमांचे प्रतिनिधी दोघांना प्रश्न विचारत होते. अशरफ उत्तर देत होता की, ‘मेन बात ये है कि गुड्डू मुस्लिम…’ असे म्हणत असताना तिघांनी गोळीबार सुरू केला. त्यात अतिक आणि अशरफचा मृत्यू झाला आहे. हल्ला करणारे तिघे माध्यमांचे प्रतिनिधी म्हणून तिथे उपस्थित होते. त्यांच्याकडे माध्यमांचा बूम आणि कॅमेरा होता. या तिघांनी गोळीबार केल्यानंतर लगेचच आत्मसमर्पण केले असल्याची पोलिसांनी माहिती दिली आहे.