CM Eknath Shinde Ayodhya Daura अयोध्या – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी राम मंदिरात रामलल्लाचे दर्शन घेतले आहे. त्याआधी अयोध्येत उघड्या जीपमधून शिंदे-फडणवीस यांची रॅली निघाली. यावेळी स्थानिकांकडून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. शिंदे-फडणवीस यांनी अडीच वर्षे बाजूला पडलेला हिंदूत्वाचा विचार मुख्य प्रवाहात आणला असल्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे. शिंदे-फडणवीस यांनी श्रीरामांचे घेतले दर्शन. शिंदे-फडणवीस श्रीराम मंदिरात दाखल; थोड्याच वेळात करणार आरती. शिंदेंकडून दोन तोळ्यांचा सोन्याचा धनुष्यबाण श्रीराम मंदिराला भेट म्हणून देण्यात आला आहे.
रामलल्लाच्या दर्शनाने आनंदी – फडणवीस
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे, की मी कारसेवक राहिलेलो आहे. राममंदिरासाठी कारसेवा करण्यात आली, त्यात प्रत्यक्ष सहभाग घेतला होता. राम जन्मभुमी आंदोलनाशी जोडलेला मी कार्यकर्ता आहे. बऱ्याच दिवसांपासून प्रभू रामाच्या दर्शनाची इच्छा होती. आज रामलल्लाचे दर्शन झाले आहे, त्याचा विशेष आनंद आहे.
मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांनी हनुमान गढीच्या दर्शनाला
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी रामलल्लाच्या दर्शनानंतर निर्माणाधिन राम मंदिरांची पाहाणी केली. त्यानंतर शिंदे आणि फडणवीस हनुमान गढी येथे पोहोचले आणि रामभक्त हनुमानाचे दर्शन केले आहे.
मुख्यमंत्र्यांनी घेतले रामल्लाचे दर्शन
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रामलल्लाचे दर्शन घेतले आहे. यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई, रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे, बंदरे व खनिकर्म मंत्री दादा भुसे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम, आमदार रवी राणा, खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित होते.
अडीच वर्षे बाजूला पडलेला हिंदूत्वाचा विचार पुन्हा प्रस्थापित – उदय सामंत
हिंदुत्वाचा जो विचार गेले अडीच वर्ष बाजुला राहिला होता, तो पुन्हा एकदा प्रस्तापित केला आहे. आणि त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज इथे आले आहे, असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे.
उत्तर प्रदेशची जनता जी महाराष्ट्रामध्ये राहते. त्यांना सुख-सोई आणि काय ताकद दिली पाहिजे. यावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत चर्चा होण्याची शक्यता असल्याचे सामंत यांनी म्हटले आहे. आयोध्या सारख्या पवित्र ठिकाणी आलेलो आहे. त्यामुळे संजय राऊत यांच्यावर आता काहीही बोलायचं नाही, असंही सामंत यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं.
प्रभू श्रीराम जन्मभूमी पवित्र क्षेत्र अयोध्या येथे आगमन https://t.co/tqWFrr5wML
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) April 9, 2023