देशभरात कोरोनाची दुसरी लाट हळूहळू मंदावत आहे. एकाच वेळी ४ लाख दररोज कोरोनाबाधितांची होणारी नोंद आता कमी झाली आहे. आता दररोज ३० ते ४० हजार कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. कोरोनाची दुसरी लाट मंदावत असल्यामुळे अनेक राज्यांनी लॉकडाऊन हटवला असून अनलॉक करण्यास सुरुवात केली आहे. परंतु पूर्णपणे अनलॉक केलेले नाही आहे. पण आता देशभरात तिसऱ्या लाटेचे सावट सर्वत्र पसरले आहे. यादरम्यान केंद्रीय गृहमंत्रालयाने कोरोना गाईडलाईन्समध्ये मुदतवाढ केली आहे. (MHA New Covid Guidelines) ३१ ऑगस्टपर्यंत कोरोना निर्बंध कायम असणार आहेत. कोरोना संदर्भातील सर्व नियमांचे आणि निर्बंधांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना सर्व जिल्ह्यांना देण्याची केंद्रीय गृह मंत्रालयाने (MHA) सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्राद्वारे विनंती केली आहे.
Ministry of Home Affairs (MHA) extends till August 31st 2021, its order to ensure compliance to containment measures for #COVID19.
— ANI (@ANI) July 28, 2021
गृहमंत्रालयाने सांगितले की, सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी ३१ जुलैपर्यंत कोरोना नियंत्रण आणि व्यवस्थापनावर विशेष लक्ष द्यावे. आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५च्या अंतर्गत आवश्यक उपाययोजना करता येतील. तसेच कोरोना निर्बंध कमी करण्याची प्रक्रिया खूप काळजीपूर्वक करणे आवश्यक आहे. केंद्राने कोरोना व्यवस्थापनासाठी पाच धोरण म्हणजेच टेस्ट (चाचणी), ट्रॅक, ट्रीट (उपचार), लसीकरण आणि कोरोना संबंधित व्यवहार (Covid appropriate behaviour) याचे पालन करावे असे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना सांगितले आहे.
दरम्यान देशात आज ४३ हजार ६५४ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली तर ६४० जणांचा मृत्यू झाला. तसेच ४१ हजार ६७८ जण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे देशातील सक्रीय रुग्णांची संख्या ३ लाख ९९ हजार ४३६वर पोहोचली आहे. आतापर्यंत ४ लाख २२ हजार २२ जणांचा मृत्यू झाला असून ३ कोटी ६ लाख ६३ हजार १४७ जण कोरोनामुक्त झाले आहेत.