दिल्लीतील निर्भया प्रकरणातील चारही आरोपींना गेल्या महिन्याभरात दोन वेळा फाशी देण्याची तारीख निश्चित करून देखील अद्याप ती देण्यात आलेली नाही. याला कारण आहे या आरोपींकडून सर्वोच्च न्यायालयात एकानंतर एक अशा केल्या जाणाऱ्या पुनर्विचार याचिका आणि राष्ट्रपतींकडे केल्या जाणाऱ्या दया याचिका. त्यामुळे अकारण फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी पुढे ढकलली जात आहे. त्यामुळे अखेर दिल्ली उच्च न्यायालयानेच या आरोपींना शेवटचा अल्टिमेटम दिला आहे. ‘येत्या ७ दिवसांमध्ये तुम्हाला ज्या कोणत्या कायदेशीर पर्यायाचा वापर करून प्रयत्न करायचे आहेत, ते करून घ्या. त्यानंतर मात्र तुमच्याविरोधात फाशीच्या शिक्षेच्या अंमलबजावणीसंदर्भातली कारवाई केली जाईल’, असं कोर्टाने या चौघांना सुनावलं आहे. त्यामुळे अखेर आता निर्भयाच्या दोषींचा फैसला आठवड्याभरात होणार आहे.
2012 Delhi gang-rape case: Delhi High Court gives all 4 convicts one week to resort to all legal remedies available to them. Post one week, the proceedings against them for the execution of death warrant will be initiated.
— ANI (@ANI) February 5, 2020
दरम्यान, या आरोपींच्या याचिका प्रलंबित राहिल्यामुळे चारही जणांच्या फाशीला विलंब होत आहे. त्यामुळे ज्यांच्या याचिका फेटाळल्या गेल्या आहेत, त्यांना फाशी देण्याची मागणी करणारी याचिका केंद्र सरकारकडून करण्यात आली होती. मात्र, चौघांना स्वतंत्रपणे फाशी देण्यास न्यायालयाने नकार दिला. चौघांच्या नावे एकच डेथ वॉरंट काढण्यात आलेलं आहे. त्यामुळे त्यांना एकत्रच फाशी देता येईल, असं न्यायालयाने यावेळी बजावलं.