देशात कोरोनाचा कहर अद्यापही कायम आहे. कोरोनावर प्रतिबंधात्मक उपचार म्हणून लसीकरण केले जात आहे. तसेच कोरोनाचा संसर्गापासून वाचवण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे आणि मास्क घालणे आवश्यक झाले आहे. पण या काळात अफवा पसरविण्यापासून रोखण्यासाठी अजूनही कोणते प्रभावी शस्त्र सापडले नाही आहे. दरम्यान सोशल मीडियावर सध्या कोरोनामुळे मृत्यू झाल्यास सरकारकडून ४ लाख रुपयांची मदत दिली जाते आणि त्याचा एक फॉर्म व्हायरल होत आहे. पण यामध्ये काही तथ्य आहे का? ते जाणून घ्या
सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणार एक फॉर्म बनावट आहे. ज्यामध्ये राज्याच्या आपत्ती निवारण निधी अंतर्गत कोरोनामुळे मृत्यू झाल्यास ४ लाख रुपयांची मदत देण्याची तरदूत आहे, असा दावा केला आहे. लोकांना हा दावा खरा वाटत आहे आणि त्यामुळे ते जास्तीत जास्त शेअर करत आहेत. परंतु हा दावा पूर्णपणे खोटा आहे.
पीआयबीच्या फॅक्ट चेक टीमने याचा तपास केला आणि हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचे सांगितले. पीआयबी फॅक्ट चेकच्या टीमने सांगितले की, ‘हा दावा खोटा आहे. राज्य आपत्ती निवारण निधी (#SDRF) अंतर्गत स्वीकृत निकषांमध्ये अशा प्रकारची कोणतीही तरतूद नाही.’ त्यामुळे तुम्हाला जर असा काही फॉर्म आला असेल तर तो शेअर करू नका.
दावा: राज्य आपदा मोचक निधि के अंतर्गत #COVID19 के कारण मृत्यु होने पर ₹4,00,000 की सहायता देने का प्रावधान है।#PIBFactCheck: यह दावा #फर्जी है। राज्य आपदा मोचक निधि (#SDRF) के अंतर्गत स्वीकृत मानदंडों में ऐसा कोई प्रावधान नहीं है। pic.twitter.com/KEbUl936Gl
— PIB Fact Check (@PIBFactCheck) May 29, 2021
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, आज देशात १ लाख ७३ हजार ७९० नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून ३ हजार ६१७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २ लाख ८४ हजार ६०१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. देशातील आता कोरोनाबाधितांची एकूण संख्या २ कोटी ७७ लाख २९ हजार २४७वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ३ लाख २२ हजार ५१२ जणांचा मृत्यू झाला असून २ कोटी ५१ लाख ७८ हजार ११ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच सध्या २२ लाख २८ हजार ७२४ जणांवर उपचार आहेत. देशात आतापर्यंत २० कोटी ८९ लाख २ हजार ४४५ जणांचे लसीकरण पार पडले आहे.
हेही वाचा – Maharashtra Corona: पावसाळ्यात अधिक खबरदारी घ्यावी लागेल, कारण…- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे