देशभरात जीएसटी लागू झाल्यानंतर अनेक जीवनावश्यक वस्तूंसोबतच चैनीच्या वस्तूंच्या किंमतीही वाढल्या. वाढत्या किंमतींमुळे आधीच हैराण झालेल्या सामान्यांना वेध लागले होते ते गणेशोत्सवाचे. अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सवर येऊन ठेपलेला असतानाच जीएसटीची टांगती तलवार गणेशोत्सवावर होती. मात्र, सर्व गणेशभक्त, सार्वजनिक मंडळं आणि घरगुती गणपती प्रतिष्ठापना करणाऱ्या सामान्यांना केंद्र सरकारने दिलासा दिला आहे. यंदाच्या गणेशोत्सवाला जीएसटीमधून वगळण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे गणेशमूर्ती आणि गणेशोत्सवाशी संबंधित काही सामग्रीवरील जीएसटी भरावा लागणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे ऐन सणाच्या तोंडावर गणेशोत्सवाआधीच केंद्र सरकारने सामान्यांना प्रसाद दिल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. गणेशोत्सवाप्रमाणेच रक्षाबंधन या सणासाठीही केंद्र सरकारने खुशखबर दिली असून राख्यांवरचा जीएसटीही वगळण्यात आला आहे. अर्थमंत्री पियूष गोयल यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली आहे.
Rakshabandhan is coming, we have exempted Rakhis from GST and ahead of Ganesh Chaturthi, have also exempted all kinds of statues,handicrafts, handlooms. All these things are our heritage and we have to hold on to them with respect: Finance Minister Piyush Goyal pic.twitter.com/ghfmdMmctK
— ANI (@ANI) August 12, 2018
…म्हणून किंमती राहणार आवाक्यात!
जीएसटीमुळे गणेशमूर्ती, त्यासाठी लागणारा कच्चा माल, तसेच डेकोरेशनसाठी लागणारा कच्चा माल या सर्वांच्या किंमती वाढल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे गणेशोत्सव काळात सामान्यांच्या खिशाला चाट पडणार असल्याचं स्पष्ट झालं होतं. त्या पार्श्वभीमीवर केंद्र सरकारने घेतलेला हा महत्त्वपूर्ण निर्णय सामान्यांना दिलासा देणारा ठरणार आहे. या निर्णयामुळे हा कच्चा माल वाजवी दरातच मिळणार असल्यामुळे गणेशमूर्ती किंवा डेकोरेशनचं सामान यांच्या किंमती आवाक्यात राहणार आहेत. केंद्रीय अर्थमंत्री पियुष गोयल यांनी रविवारी दुपारच्या सुमारास ट्वीट करून ही माहिती दिली.
रक्षाबंधनासाठीही दिलासा…
गणेशोत्सवासोबतच रक्षाबंधनासाठीही दिलासा मिळाला आहे. राख्या आणि त्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालालाही जीएसटीमधून वगळण्यात आले आहे. त्यामुळे राख्यांच्या किंमतीही आवाक्यातच राहणार आहेत.