भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश जोधपूरमधील न्यायालयाने दिले होते. याप्रकरणी आता हार्दिक पांड्याला जोधपूर न्यायालयातून क्लीन चिट देण्यात आली आहे. त्यामुळे हार्दिक पांड्याला मोठा दिलासा मिळाला आहे.
नेमके प्रकरण काय?
२०१८ मधील हे प्रकरण आहे. अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याच्या विरोधात राजस्थानमधील जोधपुरमध्ये २०१८ साली गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळी हार्दिक पांड्यासोबत भारतीय संघाचा उप-कर्णधार के.एल. राहुल आणि बॉलीवुड दिग्दर्शक करण जौहर याचेही नाव याप्रकरणात होते. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप त्यांच्याविरोधात करण्यात आला होता.
त्यानंतर हार्दिक पांड्याने एक निवेदन जारी करून या ट्विटशी आपला कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. हार्दिक पांड्याने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरच हे निवेदन पोस्ट केले होते.
My statement. pic.twitter.com/P67YZLJqsl
— hardik pandya (@hardikpandya7) March 22, 2018
हार्दिक पांड्याचे निवेदन
“मीडियात आज दिशाभूल करणाऱ्या अनेक बातम्या पसरल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणारे ट्विट मी केल्याचा आरोप त्यातून झाला. मात्र, यात कोणतंही तथ्य नसून अशाप्रकारचे कोणतेही विधान मी ट्विटर वा अन्य कोणत्याही माध्यमातून केलेले नाही. ज्या ट्विटवरून काहूर माजले आहे ते ट्विट माझ्या नावाच्या एका बनावट अकाऊंटवरून करण्यात आलेले आहे. ट्विटरवर माझं व्हेरिफाइड अकाऊंट असून त्या अकाऊंटच्या माध्यमातूनच मी नेहमी संवाद साधत आलो आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भारताची राज्यघटना आणि भारतातील विविध जनसमुदायांबद्दल माझ्या मनात नितांत आदर आहे. माझ्यामुळे कुणी दुखावलं जाईल, असे विधान मी करणं शक्य नाही वा अशा कोणत्याही वादात मी पडत नाही. केवळ चाहत्यांशी संवाद साधण्यासाठीच मी सोशल मीडियाचे व्यासपीठ वापरतो. हे ट्विट माझे नसल्याचे सिद्ध करण्यासाठी मी आवश्यक पुरावे कोर्टाकडे सादर करेन तसेच माझ्याविरोधातील याचिका मागे घेण्याची विनंती करेन”, असेही हार्दिक पांड्याने नमूद केले होते.
हेही वाचा – माझ्याकडून चूक झाली, मला क्षमा करा; अखेर राज्यपालांचा माफीनामा