राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. ही बैठक २९ नोव्हेंबरला होणार आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी मोदी सरकारला घेरण्याची ठरणार रणनीती या बैठकीत ठरु शकते. संसदेच्या पावसाळी अधिवेशानत विरोधी पक्ष कृषी कायदे, शेतकरी आंदोलन, पेगासस आदी वियांवर एकत्र आले होते.
दरम्यान, संसदेचं हिवाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. २९ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर या काळात संसंदेचं हिवाळी अधिवेशन घेण्यात यावं, अशी शिफारस संसदीय कामकाज पाहणाऱ्या मंत्रिमंडळाच्या समितीने केली आहे. दरम्यान, या अधिवेशनात सत्ताधारी मोदी सरकारला कोणत्या विषयांवर घेरलं पाहिजे या मुद्द्यांवर रणनीती ठरवण्यासाठी मल्लिकार्जुन खरगे यांनी बैठक बोलावली असावी. केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घतेले आहेत. मात्र, शेतकरी त्यांच्या आंदोलनावर ठाम आहेत. जो पर्यंत एमएसपीचा कायदा होत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे.
Leader of Opposition in Rajya Sabha Mallikarjun Kharge has called a meeting of the Opposition parties on 29th November.
(file photo) pic.twitter.com/pWMBwxTzFP
— ANI (@ANI) November 26, 2021
तसंच, देश कोरोना महामारीचा सामना करत आहे. कोरोनामुळे लाखो लोकांचा मृत्यू झाला. अनेकांच्या घरातील कमवणाऱ्यांचा मत्यू झाला. कोरोनामुळे ज्यांचा मृत्यू झाला आहे त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना ४ लाखांची मदत करावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. त्यामुळे या मुद्द्यावर देखील सरकारला धारेवर धरण्याची रणनीती या बैठकीत होऊ शकते.
संसदेचं ऑगस्ट महिन्यातील पावसाळी अधिवेशन चांगलंच गाजलं. पेगॅसस आणि नव्या कृषी कायद्यावरुन विरोधकांनी सरकारला चांगलच घेरलं होतं. या मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्याची मागणी केली होती. त्यावरुन लोकसभेत आणि राज्यसभेत चांगलाच गदारोळ माजला होता. राज्यसभेतील अभूतपूर्व गोंधळानंतर सभागृह आहे की कुस्तीचा आखाडा असा प्रश्न पडावा अशी स्थिती निर्माण झाली होती.
अभूतपूर्व गोंधळामुळे सभागृहात मार्शल्स बोलवावे लागले होते. मोठ्या प्रमाणात मार्शल्स बोलावण्यात आले की खासदारांऐवजी मार्शल्सची संख्या जास्त दिसत होती. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये या गोंधळावरुन आरोप प्रत्यारोप सुरु होते. १९ जुलै ते १३ ऑगस्ट या काळापर्यंत प्रस्तावित असलेलं संसदेचं अधिवेशन सरकारनं ते दोन दिवस आधीच गुंडाळलं. त्यातही अशा अभूतपूर्व गोंधळातच या अधिवेशनाचा समारोप झाला होता.
दरम्यान, संसदीय कामकाज पाहणाऱ्या मंत्रिमंडळाच्या समितीने संसदेचं हिवाळी अधिवेशन नोव्हेंबरच्या अखेरपासून घेण्याची शिफारस केली आहे. २९ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर या काळात संसंदेचं हिवाळी अधिवेशन घेण्यात यावं, अशी शिफारस समितीने केली आहे. ज्यामध्ये सुमारे २० बैठका असतील.