नवी दिल्ली : ओडिशातील बालासोर रेल्वे अपघातात (Odisha Train Accident) आतापर्यंत 250हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. यापैकी 101 मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नाही. मृतदेहांची ओळख पटवण्यात आम्हाला खूप अडचणी येत आहेत. काही मृतदेहांवर अनेक जण दावा करत आहेत, असे हावडा अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी जितिन यादव (Howrah ADM Jitin Yadav) यांनी सांगितले. तथापि, यातून मार्ग काढण्यासाठी भुवनेश्वर एम्स (Bhubaneswar AIIMS) पुढे आले असून एम्सने डीएनए (DNA) सॅम्पलिंग सुरू केले आहे. मृतदेहावर दावा करणाऱ्या कुटुंबाकडून 10 डीएनए नमुने घेण्यात आले आहेत.
Odisha | Bhubaneswar Municipal Corporation and West Bengal government have set up helpdesks at AIIMS Bhubaneswar for people looking for their kin after the three-train accident in Balasore
There are cases where one body is being claimed by multiple families. In such cases, we… pic.twitter.com/0H5rQKP29U
— ANI (@ANI) June 6, 2023
एकूण 278 पैकी 177 मृतदेहांची ओळख पटल्यानंतर ते नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. उर्वरित 101 मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नाही. शरीर सडू नयेत म्हणून मृतदेह पाच वेगवेगळ्या कंटेनरमध्ये ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे आता सहा महिने मृतदेह सुरक्षित राहतील आणि मृतदेहांवर अंतिम संस्कार करण्याची घाई करण्याची गरज नाही, असे एम्सचे उपअधीक्षक डॉ. प्रवाह त्रिपाठी यांनी सांगितले.
मात्र, तरीही मृतदेह ताब्यात घेण्यात अडचणी येत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. सोमवारी आम्ही उपेंद्र कुमार शर्मा यांच्या मृतदेहाची ओळख पटवली. मी टॅटूच्या आधारे उपेंद्रला ओळखले होते. पण तरीही मंगळवारी मृतदेह दुसऱ्याच्या ताब्यात दिला, असा आरोप झारखंडमधील एका तरुणाने एम्स प्रशासनावर केला. मृतदेह जर दुसऱ्यांच्याच ताब्यात द्यायचा आहे, तर, डीएनए सॅम्पलिंगची काय गरज आहे, असा सवालही या तरुणाने केला. डॉ. त्रिपाठी याचा इन्कार करताना सांगितले की, असे काही होत नाही. संपूर्ण पडताळणी करूनच मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात येतो. पण हेही खरे आहे की, एका मृतदेहावर अनेक कुटुंबे दावा करत आहेत. म्हणून आम्ही डीएनए सॅम्पलिंग करत आहोत. अहवाल यायला सात ते आठ दिवस लागतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
मृतांपैकी बहुतांश या राज्यांतील आहेत
पश्चिम बंगाल आणि ओडिशा प्रशासनाने संयुक्तपणे एम्स भुवनेश्वर येथे हेल्पडेस्क सुरू केला आहे. बहुतेक बळी पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि ओडिशा या राज्यांतील आहेत, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. सीबीआय, रेल्वे सुरक्षा आयुक्त आणि जीआरपी यांनी रेल्वे अपघाताची चौकशी सुरू केली आहे.