कोरोनाचे संकट जगावर असतानाही पाकिस्तानच्या कुरापती काही थांबत नाहीत. शुक्रवारी सकाळी ११ वाजल्यापासून पाकिस्तानने जम्मू काश्मीरच्या उरी सेक्टरजवळ असलेल्या नियंत्रण रेषेजवळ गोळीबार सुरू केला होता. त्याला भारताने चोख प्रत्युत्तर दिलं आहे. भारताने आज पाकिस्तानच्या खुरापतींना उत्तर देताना पाकिस्तानातील दहशतवादी तळच उडवले आहेत.
#WATCH Video shot from drone as Indian army precision targets Pakistani terror launch pads (video source: Indian Army) pic.twitter.com/gjTtbARadv
— ANI (@ANI) April 10, 2020
तोफांनी अचूक मारा करत पाकिस्तानातील दहशतवादी तळ, मोठ्या प्रमाणातला शस्त्रसाठा उद्धवस्त करण्यात भारतीय सैन्याला यश मिळालं आहे. पाकिस्तानच्या कुरापतींना भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिलं आहे. पाक सैनिकांनी शुक्रवारी सकाळी ११ वाजता कुपवाडातील केरन सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचं उल्लंघन करत गोळीबार सुरू केला. भारतीय लष्कराच्या जवानांनीही या गोळीबाराला चोख उत्तर द्यायला सुरूवात केली. संध्याकाळी ६ वाजेपर्यंत दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरूच होता. यावेळी भारतीय लष्कराच्या जवानांनी सीमेपलिकडे असलेल्या दहशतवादी तळांना लक्ष्य केलं आणि पाकिस्तानचा दारूगोळा नष्ट केला. एएनआयने या संदर्भातला ड्रोन व्हिडीओही ट्विट केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानी सैनिकांकडून सीमेवर सतत गोळीबार करण्यात येत होता. केरन सेक्टरमध्ये १ एप्रिलला दहशतवाद्यांनी भारतात घुसखोरीचा प्रयत्न केला होता. भारतीय लष्कराच्या जवानांनी दहशतवाद्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला. पण यावेळी झालेल्या चकमकीत ५ जवान शहीद झाले.