भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) बुधवारी महाराष्ट्रातील आणखी एका बँकेवर कारवाई केली आहे. त्यामुळे त्या बँकेत खाते असणाऱ्या ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागू शकते. आरबीआयने सांगली येथील सर्जेरावदादा नाईक शिराळा सहकारी बँकेचा परवाना रद्द केला आहे. बँकेकडे पुरेसे भांडवल आणि कमाईची क्षमता नसल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे आरबीआयने म्हटले आहे.
परवाना रद्द केल्यामुळे सर्जेरावदादा नाईक शिराळा सहकारी बँक लिमिटेडने बुधवारी कामकाजाची वेळ संपल्यापासून सर्व बँकिंग व्यवहार बंद केले आहेत, असे आरबीआयने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनानुसार, महाराष्ट्राचे सहकार आयुक्त आणि सहकारी संस्थांच्या समितीनेही बँक बंद करण्याचे आदेश जारी करून कर्जदारांसाठी लिक्विडेटर नेमण्याची विनंती केली आहे.
प्रत्येक ठेवीदार, लिक्विडेशनवर, डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) कडून पाच लाख रुपयांच्या आर्थिक मर्यादेपर्यंत ठेव विमा दाव्याची रक्कम प्राप्त करण्याचा हक्कदार असेल.
RBI ने सांगितले की, बँकेने दिलेल्या माहितीनुसार, 99 टक्क्यांहून अधिक ठेवीदारांना त्यांच्या ठेवींची संपूर्ण रक्कम DICGC कडून मिळण्याचा अधिकार आहे. तसेच ही बँक सध्याच्या आर्थिक स्थितीमुळे तिच्या विद्यमान ठेवीदारांना पूर्ण देयके देऊ शकली नसती, म्हणून तिचा परवाना रद्द करण्यात आला आहे.
27 जानेवारी 2022 पर्यंत DICGC ने बँकेच्या संबंधित ठेवीदारांच्या वतीने एकूण विमा रकमेपैकी 64.70 कोटी रुपये मंजूर केले होते.