वाराणसी – जम्मू-काश्मीरच्या हैदरपौरा येथे सुरक्षादलाच्या चकमकीत मारल्या गेलेल्या दहशतवादी आमीर माग्रेचा मृतदेह कबरमधून बाहेर काढण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. आमीरचे वडील लतीफ यांनी यासंदर्भात याचिका दाखल केली होती. मुलाच्या मृतदेहावर अंतिम संस्कार करता यावेत याकरता कबरीमधील शव देण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयात केली होती.
हेही वाचा – ज्ञानवापी मशिदीप्रकरणी पुढील सुनावणी होणार २२ सप्टेंबरला, मुस्लिम पक्षाची याचिका फेटाळली
न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती बीएस पारदीवाला यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी पार पडली. एकदा दफन केलेल्या शवाला बाहेर काढले जात नाही, असं खंडपीठाने म्हटलं आहे. जम्मू-काश्मीरमधून जी माहिती मिळाली आहे त्यानुसार, मृतदेहाला विधीवत पुरण्यात आलं आहे. त्यामुळे या शवाला पुन्हा बाहेर काढता येणार नाही.
‘वडिलांच्या भावनांचा आदर आहेच, पण न्यायालय भावनांवर चालत नाही. त्यामुळे जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाचा निर्णय न्यायसंगत आहे,’ न्यायालयाने मोहम्मद लतीफ माग्रेद्वारे दाखल करण्यात आलेली याचिका फेटाळली आहे. तसंच कबरीवर जाऊन नमाज अदा करण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयाने कुटुंबाला दिली आहे.
हेही वाचा – याकूब कबरीच्या प्रकरणी चौकशी होऊनच जाऊ द्या! सामनातून शिवसेनेचा भाजपवर हल्लाबोल
सुनावणी दरम्यान, जम्मून काश्मीरचे वकील अर्धेंदुमौली प्रसाद यांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितलं की, मृत व्यक्ती हा एक दहशतवादी होता. त्याच्यावर इस्लामी-रितीरिवाजानुसारच अत्यंसंस्कार करण्यात आले होते. या प्रकरणाला आता आठ महिने झाले. त्याचं शव खराब झालं असेल. त्यामुळे हे शव आता बाहेर काढल्याने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. माग्रेंनी जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयानेही मुलाचा मृतदेह बाहेर काढण्याची परवानगी दिली नाही. गेल्यावर्षी १५ नोव्हेंबर रोजी श्रीनगरमध्ये झालेल्या हल्ल्यात आमीर माग्रेसह चारजणांचा मृत्यू झाला होता.
याकूब मेमन प्रकरणी महाराष्ट्रात वाद
मुंबईतील बडा कब्रस्थान येथील याकूब मेमनच्या कबरीवर सुशोभीकरण करण्यात आल्याने महाराष्ट्रात वाद पेटला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात याकूब मेमनच्या कबरीवर प्रकाशयोजना आणि सुशोभीकरण करण्यात आल्याचा दावा भाजपाने केला आहे. तर, महाविकास आघाडीने हा दावा फेटाळून दहशतवाद्याचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात का दिला होता असा प्रतिप्रश्न विचारला.
दरम्यान, भारतात २६/११ च्या हल्ल्यात पकडला गेलेला कसाबला फाशी झाली होती. यावेळी कसाबचा मृतदेह त्याच्या कुटुंबियांच्या ताब्यात न देता परस्पर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. तसे, अफजल गुरू याला मारल्यानंतरही भारत सरकारने त्याच्यावर परस्पर अंत्यसंस्कार केले होते. त्यामुळे दहशतवाद्यांचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला जात नाही.