घरमहाराष्ट्रयाकूब कबरीच्या प्रकरणी चौकशी होऊनच जाऊ द्या! सामनातून शिवसेनेचा भाजपवर हल्लाबोल

याकूब कबरीच्या प्रकरणी चौकशी होऊनच जाऊ द्या! सामनातून शिवसेनेचा भाजपवर हल्लाबोल

Subscribe

याकूब कबरीच्या प्रकरणात आम्हीही फडणवीसांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून शंभर प्रश्नांचा भडीमार करू शकतो, पण राजकारण इतक्या खालच्या स्तरावर निदान आम्ही नेऊ इच्छित नाही. मुंबई दंगलीचा आणि बॉम्बस्फोटांचा सर्वात मोठा घाव शिवसेनेवरच बसला. तेव्हा हे आजचे ‘कुळे-बुळे’ हिंदुत्ववादी कोणत्या बिळांत लपून बसले होते हे महाराष्ट्र जाणतो. आज याकूब याकूब म्हणून छाती पिटणारे तेव्हा कोणत्याच लढाईत नव्हते. शिवसेनाच सगळ्यांची रक्षणकर्ती म्हणून पुढे होती. याकूब मेमनच्या कबरीवरील सजावटीची चौकशी करण्याची घोषणा (उप)मुख्यमंत्री फडणवीसांनी केली. होऊनच जाऊ द्या! आम्ही त्या चौकशीचे स्वागतच करीत आहोत. अशा शब्दात सामनातून शिवसेनेने भाजपवर हल्लाबोल केला आहे.

महाराष्ट्राची सत्ता ओरबाडून घेतल्यावर तरी भाजपचा आत्मा शांत होईल असे वाटले होते; पण भाजपचा आत्मा मरून त्याची जागा पिशाच्चाने घेतली आहे याविषयी महाराष्ट्रीय जनतेच्या मनात तिळमात्र शंका राहिलेली नाही. भारतीय जनता पक्षातील काही बावनकुळेंनी याकूब मेमन प्रकरणात जी ‘बुळे’गिरी चालवली आहे तो सर्वच प्रकार किळसवाणा आहे. मुंबई बॉम्बस्फोटांतील फाशी दिलेला आरोपी याकूब मेमन याच्या कबरीतील परिसरात दिवे लावले. ती कबर संगमरवरी दगडाने सजवली व त्याचे खापर भाजपमधील कुळ्यांनी आणि बुळ्यांनी शिवसेनेवर फोडले. सध्या महाराष्ट्रातील सर्व जीवनावश्यक विषय जणू संपले आहेत. त्यामुळेच भाजपने याकूब मेमनची कबर खणण्याचे कार्य हाती घेतले आहे. मूळ प्रश्नांपासून लोकांचे लक्ष विचलित करायचे असले की हिंदू-मुसलमान, हिजाब, हिंदुस्थान-पाकिस्तान अशा विषयांची मढी उकरून समाजात तणाव निर्माण करायचा हेच यांचे धंदे आहे. अशा शब्दात शिवसेनेने भाजपवर टीकास्त्र डागले आहे.

- Advertisement -

मुळात कोण कुठला तो याकूब? त्याचा कुणाशी संबंध का जोडायचा? शिवसेना आज सत्तेवर असती व याकूबच्या कबरीचा विषय उकरून कोणी त्या कबरीतली माती भाजपवर उडवली असती तर आम्ही तेथेच त्यांचे थोबाड बंद करून जाब विचारला असता, ‘ते आमचे राजकीय विरोधक असतीलही, पण त्यांच्यावर असले घाणेरडे आरोप करणे योग्य नाही. महाराष्ट्रातील कोणताही पक्ष बॉम्बस्फोटांतील आरोपींचे वा त्यांच्या कबरीचे उदात्तीकरण करणारा नाही. तेव्हा थोबाडे बंद करा!’ ही आमची भूमिका आजही ठाम आहे. याकूब मेमनला बॉम्बस्फोटप्रकरणी नागपूर तुरुंगात फाशी दिले. खरं तर अशा प्रकारच्या आरोपींचे ‘दफन’ हे तुरुंग परिसरातच केले जाते. संसदेवरील हल्ल्यांचा सूत्रधार अफझल गुरू याला फासावर लटकवले व तिहार कारागृहाच्या आवारातच दफन केले. कश्मीरात तेव्हा तणाव निर्माण झाला. याकूब मेमनच्या बाबतीत हे सर्व सोपस्कार नागपुरातच करता आले असते. म्हणजे पुढचे कबरीचे प्रकरण घडलेच नसते, पण तेव्हा मुख्यमंत्री होते आपलेच देवेंद्रजी. त्यांनी उदार अंतःकरणाने एका दिलदारीने याकूबचा मृतदेह मुंबईतील त्याच्या नातेवाईकांना सोपवला. माहीम येथून त्याची मोठी अंत्ययात्रा निघाली. बडा कब्रस्तानात त्याचे दफन झाले. त्यामुळे विषय संपला होता, पण आता तो आता पुन्हा बाहेर पडला. खरे तर कब्रस्तानच्या जागांवर हक्क आणि मालकी कुणाची? त्या कब्रस्तानात कोण काय करते यावर भाजपची नजर कधीपासून गेली? ना त्या जमिनीवर सरकारची मालकी ना पालिकेची. तरीही असल्या घटनांची माती उकरून शिवसेना, ठाकऱ्यांविरुद्ध ‘बांगबाजी’चे घाणेरडे राजकारण सुरू आहे. असा आरोपही शिवसेनेच्या सामना अग्रलेखातून भाजपवर करण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वी औरंगजेबाच्या कबरीवरूनही भाजपने असाच बखेडा केला होता, पण आता स्वतःचं सरकार येताच औरंगजेबाचे नाव घ्यायला ते तयार नाहीत. आमचे सरकार असताना औरंगजेबाची कबर कशी राहते ती पाहतो. कुदळ-फावडी आणून फोडून टाकतो, अशी भाषा करणारे आता कोठे आहेत? आता तर फडणवीसांचे राज्य आहे. मग लागा कामाला. कुठे गेली तुमची कुदळ-फावडी? आता औरंगजेब राहिला बाजूला; याकूब मेमनची कबर उकरायला निघालेत. जरूर उकरा. महाराष्ट्रात औरंगजेब, शाहिस्तेखानाची थडगी, स्मारके हवीत कुणाला? बाबराप्रमाणे ते आमचे कोणीच लागत नाहीत, पण सत्ता येताच तुमची तोंडे बंद होतात. वळवळणाऱ्या शेपटय़ा आत जातात. कारण गाडलेल्यांची व तुमची
‘बावनकुळे’ जणू एकच आहेत. महाराष्ट्रात जीवन-मरणाचे प्रश्न उफाळून येत असताना या कुळ्या-बुळ्यांना हे विषय सुचतात तरी कसे? असा सवाल करत भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळेंवर जहरी टीका केला आहे.

- Advertisement -

शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या आपल्या महाराष्ट्रात सुरू आहेत. राज्यात जागोजाग महापुराचे थैमान सुरू आहे. म्हणजे ओल्या दुष्काळाचे संकट आहे. नैसर्गिक संकटांमुळे शेती उत्पादनात होणारी घट, शेतमालास योग्य भाव न मिळाल्याने कर्जाचा वाढता डोंगर अशा विविध कारणांमुळे राज्यात शेतकरी, शेतमजूर आत्महत्या करीत आहेत. एका यवतमाळ जिल्हय़ातच दोन महिन्यांत तीनशेवर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. गेल्या वर्षभरातच 10 हजार 881 शेतकरी व शेतमजुरांनी आत्महत्या केल्या असून महाराष्ट्र शेतकरी आत्महत्येच्या आकडेवारीत पहिल्या क्रमांकावर असल्याची धक्कादायक माहिती राष्ट्रीय गुन्हे नोंदणी अहवालातून बाहेर आली आहे. याकूबच्या कबरीचे राजकीय भांडवल करणाऱ्या कुळ्या-बुळ्यांनी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या कराव्या लागलेल्या हजारो शेतकऱ्यांच्या चितेवरील राखेवरही दोन अश्रू ढाळावेत. असा खोचक टोला शिवसेनेने भाजपला लगावला आहे.

याकूब कबरीच्या प्रकरणात आम्हीही फडणवीसांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून शंभर प्रश्नांचा भडीमार करू शकतो, पण राजकारण इतक्या खालच्या स्तरावर निदान आम्ही नेऊ इच्छित नाही. हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे. मुंबई दंगलीचा आणि बॉम्बस्फोटांचा सर्वात मोठा घाव शिवसेनेवरच बसला. तेव्हा हे आजचे ‘कुळे-बुळे’ हिंदुत्ववादी कोणत्या बिळांत लपून बसले होते हे महाराष्ट्र जाणतो. आज याकूब याकूब म्हणून छाती पिटणारे तेव्हा कोणत्याच लढाईत नव्हते. शिवसेनाच सगळ्यांची रक्षणकर्ती म्हणून पुढे होती. याकूब मेमनच्या कबरीवरील सजावटीची चौकशी करण्याची घोषणा (उप)मुख्यमंत्री फडणवीसांनी केली. होऊनच जाऊ द्या! आम्ही त्या चौकशीचे स्वागतच करीत आहोत, अस आव्हानही शिवसेनेने भाजपला केले आहे.


राज्यभरातून मंत्रालयात तक्रारी घेऊन जाणाऱ्यांना दिलासा; आता ‘या’ ठिकाणी अर्ज करताच होणार कार्यवाही


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -