देश कोरोनाच्या संकटाचा सामान करत असतानाच दुसरीकडे कोट्यावधी नागरिकांचे रोजगार धोक्यात आलेत. अर्थव्यवस्थेला गती देणाऱ्या क्षेत्रांचे कोरोनामुळे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे कित्येकांना बेरोजगारीचा सामना करावा लागला. यामुळे देशातील सर्वाधिक तरुण पिढी आज बेरोजगारीची झळ सहन करत आहे. यात डिसेंबर २०२१ मध्ये बेरोजगारीच्या दरात मोठी वाढ झाली आहे.
नोव्हेंबरमध्ये हा दर 7 टक्के तर ऑक्टोबरमध्ये हा दर 7.75 टक्क्यांवर होता. मात्र डिसेंबर 2021 मध्ये देशातील बेरोजगारीचा दराने जवळपास 7.91 टक्क्यांच्या चार महिन्यांची उच्चांक पातळी गाठली. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE) ने आकडेवारी जारी केली आहे.
मागील 2021 च्या ऑगस्टमध्ये बेरोजगारीचा दर हा 8.3 टक्क्यांवर पोहचला होता. त्यानंतर सरत्या डिसेंबरमध्ये बेरोजगारीचा दर पुन्हा एकदा मोठ्याप्रमाणात वाढला आहे. त्यामुळे ऑगस्टनंतरचा बेरोजगारीचा हा उच्चांक आकडा आहे.
आकडेवारीनुसार, शहरांमधील बेरोजगारीचा दर डिसेंबरमध्ये 9.30 टक्के होता, जो नोव्हेंबर 2021 मध्ये 8.21 टक्के होता. तर ग्रामीण भागातील बेरोजगारीचा दर हा डिसेंबरमध्ये 7.28 टक्के होता जो मागील महिन्यात 6.44 टक्क्यांवर आला.
केवळ 40 लाख लोकांचा मिळाला रोजगार
CMIE चे व्यवस्थापकीय संचालक आणि CEO महेश व्यास म्हणाले की, डिसेंबर 2021 मध्ये रोजगार वाढला आहे, परंतु नोकरी शोधणाऱ्यांची संख्या त्याहून अधिक आहे.विविध क्षेत्रात नोकरदारांची संख्या वाढतेय हे चांगले लक्षण आहे. मात्र अद्याप ८३ लाख अतिरिक्त लोक नोकऱ्यांच्या शोधात आहेत यातील केवळ 40 लाख लोकांनाच रोजगार मिळाला.
जगात ओमिक्रॉन व्हेरिएंटची वाढती रुग्णसंख्या पाहता देशात कोरोनाची तिसरी लाट येणार असे म्हटले जातेय. यामुळे देशातील आर्थिक स्थिती पुन्हा एकदा अडचणीत जाण्याची स्थितीत आहे. अशात देशात बेरोजगारीचा आकडा पुन्हा एकदा वाढणार अशी स्थिती निर्माण झाली आहे.