नवी दिल्ली : भारतातील रस्ते आणि महामार्ग प्रकल्प हे गुंतवणूकदारांसाठी सोन्याच्या खाणीसारखे आहेत. त्यामुळे अधिकाधिक उद्योजकांनी त्यात गुंतवणूक करावी, असे आवाहन केंद्रीय रस्ते आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी अमेरिकेतील गुंतवणूकदारांना केले आहे. 19व्या भारत- अमेरिका आर्थिक परिषदेचे ऑनलाइन उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.
भारत-अमेरिका चेंबर ऑफ कॉमर्सने ही परिषद आयोजित केली आहे. यंदा या परिषदेची संकल्पना “पुढच्या 25 वर्षांसाठीचा नवा अजेंडा” अशी असून, त्यातून आपले संबंध अधिक दृढ करण्यासाठीचा एक आराखडा तयार केला जाणार आहे. आपल्याला नव्या मार्गांची आखणी करताना, काही चौकटी बाहेरचा विचार आणि नव्या सृजनशील उपायांचा अवलंब करण्यास प्रोत्साहन द्यायला हवे, असे गडकरी म्हणाले.
हेही वाचा – कसं काय पाटील बरं हाय ना, काल दिल्लीत काय झालं ते खरं हाय ना? मुख्यमंत्र्यांचा जयंत पाटलांना टोला
आम्ही देशभरात 10,000 किमीचे 27 ग्रीनफील्ड द्रुतगती मार्ग विकसित करणार आहोत आणि त्यासाठी 5 लाख कोटी म्हणजे 60 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले. या प्रकल्प गुंतवणुकीत, किरकोळ गुंतवणूकदारांनाही सहभागी करण्याच्या दृष्टीने आम्ही इन्व्ही आयटी (InvIT) यासारखे काही गुंतवणूकस्नेही अभिनव उपक्रम देखील राबवत आहोत. आमच्या उत्पादनांची संरचना अशाप्रकारे करीत आहोत, जेणेकरुन किरकोळ गुंतवणूकदारांना त्यातून चांगला परतावा मिळू शकेल. हा परतावा मुदतठेवीवरील व्याजदरांपेक्षा अधिक असेल, असेही गडकरी म्हणाले.
आज भारत इलेक्ट्रिक वाहनांसाठी सर्वात मोठी बाजारपेठ ठरला आहे. मग, त्या दुचाकी असोत, तीनचाकी अथवा चारचाकी असोत. इलेक्ट्रिक वाहनांसाठी सौर आणि पवन उर्जेवर आधारित चार्जिंग यंत्रणा उभारण्यास सरकार प्रोत्साहन देत आहे. इलेक्ट्रिक हायवे विकसित करण्याच्या संकल्पनेवर देखील आम्ही काम करत असून सौर ऊर्जेतून मिळणाऱ्या विजेवर आधारित या महामार्गांवर ट्रक आणि बसेस यासारख्या मोठ्या वाहनांचे बॅटरी चार्जिंग देखील शक्य होईल, अशी आशा गडकरी यांनी व्यक्त केली.
हेही वाचा – ईडीच्या टायपिंग मिस्टेकमुळे ममता बॅनर्जींच्या नातेवाईकाला मनस्ताप