मुंबई | “लिव्ह इन रिलेशनशिप (Live-In Relationship) कायद्यामुळे गुन्ह्यांचे प्रमाणही वाढले आहे”, असे विधान हरियाणा महिला आयोगाच्या (Haryana State Commission for Women) अध्यक्षा रेणू भाटिया यांनी केले आहे. हरियाणातील कैथल जिल्ह्यातील आरकेएसडी कॉलेजमध्ये कायदे आणि सायबर क्राइम या विषयावर जनजागृतीवर कार्यक्रम नुकताच पार पडला. या कार्यक्रमात रेणू भाटिया (Renu Bhatia) या प्रमुख अतिथी होत्या. “मुली ओयो हॉटेलमध्ये जाऊन हनुमानाची आरती करायला जात नाहीत ना? असा खोचक प्रश्न करून त्या म्हणाल्या, या मुलींनी लक्षात ठेवले पाहिजे की, तिथे मुलींसोबत कोणताही वाईट प्रसंग घडू शकतो”, असे विधानही रेणू भाटिया यांनी यावेळी केले आहे.
“सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार बनविलेल्या लिव्ह-इन रिलेशनशिप कायद्यामुळे महिलांशी संबंधित प्रकरणे सोडविताना आयोगाचे हात बांधले गेले आहेत. लिव्ह-इन रिलेशनशिप कायद्यात बदल करण्याची गरज आहे”, असे रेणू भाटिया यावेळी म्हणाल्या. “आतापर्यंत महिला आयोगाकडे जेवढी प्रकरणे आली आहेत, ती पाहता अशा प्रकरणामुळे कुटुंब उद्ध्वस्त होत असल्याचे दिसते. तसेच लिव्ह-इन रिलेशनशिप कायद्यामुळेच गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. या प्रकरणांमुळे दोन कुटुंबे तुटते. या पार्श्वभूमीमुळे कायद्यात बदल करण्याची गरज आहे”, अशी मागणीही रेणू भाटिया यांनी केली आहे.