जेएनयूमध्ये रविवारी रात्री अज्ञात तरूणांनी विद्यार्थ्यांवर आणि प्राध्यापकांवर हल्ला केला. या हल्लात विद्यार्थी, प्राध्यापक जखमी झाले. या हल्ल्याचा देशभरातून निषेध व्यक्त केला जात आहे. दिल्लीबरोबरच हल्ल्याचे मुंबई,पुण्यातही पडसाद उमटू लागले आहेत. मुंबईमध्ये गेले दोन दिवस याच्या निषेधार्थ गेट वे ऑफ इंडियावर आंदोलन सुरू आहे. तर अनेकांनी सोशलमिडीयाच्या माध्यमातून हल्ल्याचा तीव्र विरोध केला आहे. यात सेलेब्रेटीही मागे नाहीयेत. अनेक बॉलिवूडकरांनी ट्वीट करत या हल्ल्याचा निषेध केला आहे. ज्याचे कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांनीही या घटनेबाबत ट्विटरद्वारे भाष्य केले होते. ते ट्विट बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरच्या चांगलंच पसंतीस पडलं असून तिने आदित्य ठाकरेंचं कौतुक केलं आहे. सोनम कपूरने आदित्य ठाकरेंच्या ट्विटवर दिलेली प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणात व्हायरल होतेय.
The violence and brutality faced by students, while protesting, is worrisome. Be it Jamia, be it JNU. Students mustn’t face brutal force!
Let them be!
These goons must face action. They must be brought to time bound and swift justice.— Aaditya Thackeray (@AUThackeray) January 5, 2020
“निषेध करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेला हल्ला चिंताजनक आहे. जामिया असो किंवा जेएनयू…विद्यार्थ्यांवर क्रूर बळाचा वापर केला जाऊ नये… त्या गुंडांवर तातडीने कारवाई व्हायला पाहिजे” अशा आशयाचं ट्विट पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्वीट केलं होतं. आदित्य ठाकरे यांच्या या ट्वीटला रिट्विट करत सोनम कपूरने प्रतिक्रीया दिली आहे. आपल्याला अशाच नेत्यांची गरज आहे…अद्यापही अपेक्षा कायम आहेत. आदित्य ठाकरेंच्या या ट्विटवर प्रतिक्रिया देताना सोनम कपूरने “आपल्याला अशाच नेत्यांची गरज आहे…अद्यापही अपेक्षा कायम आहेत” असं ट्विट केलंय. सोनमचं हे ट्विट चांगलंच व्हायरल होत असून अनेक नेटकरी तिच्या ट्विटवर विविध प्रतिक्रिया देत आहेत.
We need leaders like this. There is hope. https://t.co/3imd9znQP2
— Sonam K Ahuja (@sonamakapoor) January 5, 2020
रविवारी सायंकाळी जेएनयू शिक्षक संघटनेने विद्यार्थी संघटनांची बैठक बोलावली होती. त्यावेळी तोंडावर बुरखा चढवून काही तरुण महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये शिरले. त्यांनी दिसेल त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली, असा आरोप जेएनयू विद्यार्थी संघटनेने केला आहे. या हल्ल्यात घोष जखमी झाल्याचे सांगितले जाते. हल्ल्यानंतर जेएनयू विद्यार्थी संघटनेने, या हल्ल्यामागे एबीव्हीपीचा हात असल्याचा आरोप केला.
मात्र विद्यार्थी परिषदेने तो फेटाळून लावला. हल्ल्यात विद्यार्थी परिषदेचे २५ कार्यकर्ते जखमी झाले आहेत. या हल्ल्यामागे डाव्या विद्यार्थी संघटना असल्याचा आरोप एबीव्हीपीकडून करण्यात आला. दरम्यान, विद्यापीठात पोलीस बोलावण्यात आले असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले जाते.