‘कहो ना प्यार है’ (Kaho Naa Pyaar Hai) ‘कोई मिल गया’ (Koi Mil Gaya) यासारख्या अनेक सिनेमांची गाणी लिहिणारे प्रसिद्ध गीतकार इब्राहिम अश्क यांचे कोरोना संसर्गाने निधन झाले. (lyricist Ibrahim Ashq dies due to corona ) ते 70 वर्षांचे होते. इब्राहिम अश्क यांची लहान मुलगी मुसफा खान हिने वडिलांचे कोरोनाने निधन झाल्याची माहिती दिली. मुंबईच्या मीरा रोड येथील एका मेडीटेक मल्टीस्पेशलिटी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. सोमवारी सकाळी 9 वाजता मिरा रोड येथील एका कब्रस्तानात त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले.
इब्राहिम अश्क यांच्या मुलाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी इब्राहिम यांना खोकला येत होता आणि त्यांना रक्ताची उल्टी झाली. त्यामुळे आम्ही त्यांना रुग्णालयात दाखल केले. त्यांची चाचणी केली असता ते कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे सांगण्यात आले. त्यांनी आधीपासूनच ह्रदयासंबंधी आजार होता. रुग्णालयात दाखल केल्या नंतर त्यांना ICU मध्ये ठेवण्यात आले. त्यानंतर त्यांची तब्येत बिघडली आणि सोमवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
इब्राहिम अश्क यांचा जन्म मध्य प्रदेशच्या मंदसौर जिल्ह्यात झाला. त्यांना लहानपणापासून लिखाणाची आवड होती. ते उत्तम शायर होते. त्यांच्या करियरची सुरुवात एक पत्रकार म्हणून झाली होती. डेली इंदौर समाचार या वृत्तापत्रात काम करत होते. कलेची आवड असल्याने ते कला क्षेत्रातही सक्रीय होते. पुढे तिच त्यांची खरी ओळख बनली.
इब्राहिम अश्क यांनी 70 वर्ष कलाविश्वास आपली मोलाची कामगिरी केली. अभिनेता ह्रतिक रोशनच्या अनेक सिनेमांची गाणी इब्राहिम यांनीच लिहिली आहेत. कहो ना प्यार है सिनेमातील त्यांची गाणी विशेष गाजली. वेलकम, ऐतबार, जानशीन, ब्लॅक अँड व्हाइट, आप मुझे अच्छे लगने लगे, बॉम्बे टू बॅकॉक यासारख्या अनेक सिनेमांची गाणी त्यांनी लिहिली आहेत.
हेही वाचा – लोकगीतकार सुनील सकट यांचे निधन