महाराष्ट्रातील डोंगर माथ्यांनी नटलेल्या भूमीत अनेक संत, महात्मे, शूर-वीर होवून गेले. महाराष्ट्राला ख-या अर्थाने महान राष्ट्र बनविणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाने व शेकडो मावळयांच्या बलिदानाने मराठा स्वराज्य उभारले गेले. महाराजांशी निष्ठा व स्वराज्य रक्षणाची तळमळ प्रत्येक मावळ्याच्या नसा-नसात भिनली होती. स्वराज्य रक्षणासाठी प्राणांची आहुती दिलेल्या वीरांच्या आठवणींशिवाय महाराष्ट्राचा इतिहास पूर्ण होत नाही. अशाच शूरवीराच्या गाथेला उजाळा देण्यास जैन फिल्म प्रॉडक्शन प्रस्तुत, निर्माते गौतम मुथा निर्मित आणि दिग्दर्शक दिपक कदम दिग्दर्शित, ‘सरनोबत’ अर्थात वेडात मराठे वीर दौडले सात, हा भव्यदिव्य चित्रपट सिनेरसिकांच्या भेटीस येत आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर आणि मोशन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. मराठीसह हा चित्रपट हिंदी आणि तेलगू भाषेतही प्रदर्शित होणार आहे.
दिग्दर्शक दिपक कदम यांनी सरनोबत चित्रपटातून वेडात मराठे वीर दौडले सात असे ज्यांच्याबद्दल म्हटले जाते त्या शूर सेनाण्यांचा म्हणजेच प्रतापराव गुजर, विसाजी बल्लाळ, दिपोजी राउतराव, विठ्ठल पिलाजी अत्रे, कृष्णाजी भास्कर, सिद्दी हिलाल व विठोजी शिंदे यांचा पराक्रम हुबेहूब मांडण्याचा प्रयत्न केला आहे. दिपक हिंदी भाषिक ऐतिहासिक ‘सरनोबत’ हा चित्रपट सिनेरसिकांच्या भेटीस घेऊन येण्यास सज्ज झाले आहेत. या चित्रपटाद्वारे दिग्दर्शक दिपक कदम बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्यास सज्ज झाले आहेत. जैन फिल्म प्रॉडक्शन प्रस्तुत, निर्माते गौतम मुथा निर्मित आणि दिग्दर्शक दिपक कदम दिग्दर्शित,या चित्रपटाला देव – सुचिर यांनी संगीत दिले असून, एस. के. वल्ली यांनी यांनी त्यांच्या कॅमेऱ्यात या चित्रपटाची भव्यदिव्यता चित्रित केली आहे. चित्रपटाची संकल्पना संजय कसबेकर, दिपक कदम यांची असून चित्रपटाची कथा अभिजित कुलकर्णी लिखित आहे.
या चित्रपटाबाबत बोलताना चित्रपाटाचे दिग्दर्शक दिपक कदम असे म्हणाले की, ‘सरनोबत’ म्हणजेच प्रतापराव गुजर, आपण लहानपणापासून एक गाणं ऐकतोय, म्यांनातून उसळे तलवारीची पात। वेडात मराठे वीर दौडले सात, पण हे सात मराठा वीर कोण आणि ते का दौडले आणि त्यांचे पुढे काय झाले याचा मागोवा घेणारी हा चित्रपट आहे.