घरफिचर्सश्रेष्ठ साहित्यिक पु. शि. रेगे

श्रेष्ठ साहित्यिक पु. शि. रेगे

Subscribe

पु. शि. रेगे यांचा आज स्मृतिदिन. पुरुषोत्तम शिवराम रेगे : (१७ फेब्रुवारी १९७८) हे श्रेष्ठ मराठी कवी, तसेच कादंबरीकार, नाटककार, समीक्षक व संपादक. त्यांचा जन्म २ ऑगस्ट १९१० रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील मिठबाव येथे झाला. शिक्षण मुंबई व लंडन येथे बी.ए. व बी.एस्सी. पर्यंत. लंडनच्या स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून त्यांनी बी.एस्सी. ही पदवी मिळविली होती. अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून विविध महाविद्यालयांतून त्यांनी काम केले. मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून ते निवृत्त झाले. ‘सुहृद चंपा’ आणि ‘रूप कथ्थक’ ही दोन टोपण नावे त्यांनी अनुक्रमे साधना आणि इतर कविता (१९३१) यातील कवितांसाठी तर ‘रूपकथ्थक’ हे टोपण नाव रंगपांचालिक आणि दोन नाटके (१९५८) या पुस्तकासाठी घेतली होती. त्यांचे अन्य साहित्य पु.शि. रेगे या नावानेच प्रसिद्ध झाले. उदा. छांदसी नावाचा त्यांचा १९६२ साली प्रसिद्ध झालेला समीक्षात्मक लेखांचा संग्रह.

साधना आणि इतर कविता ह्या त्यांच्या काव्यसंग्रहानंतर फुलोरा (१९३७), हिमसेक (१९४३), दोला (१९५०), गंधरेखा (१९५३), पुष्कळा (१९६०), दुसरा पक्षी (१९६६) आणि प्रियाळ (१९७२) हे त्यांचे कवितासंग्रह प्रसिद्ध झाले. १९४५ पर्यंतची त्यांची कविता मुक्तच्छंदात लिहिलेली असली, तरी नवकाव्य म्हणता येईल अशीही ती नव्हती. ते वळण १९४५ नंतरचे पण तरीही ते मर्ढेकरी नवकाव्याच्या वळणाचे नव्हते. त्याचे स्वरूप खास रेगेय म्हणता येईल असे होते. साहित्याखेरीज त्यांनी काही शैक्षणिक पुस्तकेही लिहिली आहेत. छंद या द्वैमासिकाचे संपादन ही रेगे यांची आणखी एक महत्वपूर्ण लक्षणीय कामगिरी.

- Advertisement -

सृजनशक्ती म्हणजेच स्त्रीशक्ती हा त्यांचा कवितेचा प्रधान विषय आहे. जीवनात विविध रूपाने वावरणारी सृजनशक्ती आणि विशेषतः तिचे स्त्रीदेहधारी स्वरूप हेच वेगवेगळ्या रूपांनी आणि स्त्रीप्रतिमांच्या साह्याने त्यांच्या कवितेत प्रकट होत असते. आणि म्हणूनच त्यांच्या कवितेमागील प्रेरणा, तीमधील अनुभवविश्व, तिची प्रतिमासृष्टी, बंदिश आणि शब्दकळा ही स्वतंत्र व वेगळ्या जातीची आहेत. या सगळ्यांमध्ये त्यांचे आगळे काव्यात्म व्यक्तीमत्व आणि स्वत्व व्यक्त झाले आहे. त्यांच्या कवितांची इंग्रजी, जर्मन, डॅनिश, स्पॅनिश व चिनी भाषांत भाषांतरे झाली आहेत. कारण त्यांत भारतीय परंपरेतून आलेली स्त्रीविषयक जाणीव आणि या जाणिवेवर झालेले आधुनिकतेचे संस्कार यांचा एक हृद्य मेळ आढळतो. रूपकथ्थक (१९५६) व मनवा (१९६८) हे त्यांचे दोन कथासंग्रह असून त्यांच्या कथांतूनही त्यांच्या कविमनाचे नाजूक पदर व त्यांचे अल्पाक्षरमणीयत्व जाणवते.

यातील काही कथा गुजराती, फ्रेंच, जर्मन, स्वीडिश, स्पॅनिश, रशियन आणि चिनी या भाषांत भाषांतरित झाल्या आहेत. सावित्री (१९६२), अवलोकिता (१९६४), रेणू (१९७३) आणि मातृका (१९७८) या रेगे यांच्या चारी कादंबर्‍या काव्यात्म व अर्थगर्भ आहेत. त्यांतील भावविश्व गूढ, तत्वस्पर्शी, सखोल व समृद्ध आहे. सावित्री ही पत्ररूप कादंबरी असून सावित्री आणि अवलोकिता या कांदबर्‍या परस्परांना पूरक ठरतील अशा स्वरूपाच्या आहेत. रेणू आणि मातृका त्याहून वेगळ्या आहेत. त्यामधूनही त्यांच्या कविमनाचे स्त्रीत्वाविषयीचे आकर्षण प्रकट झाले आहे. १९६९ सालच्या वर्धा येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. १७ फेब्रुवारी १९७८ रोजी मुंबई येथे त्यांचे निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -