घरफिचर्सश्रेष्ठ पटकथाकार मधुसूदन कालेलकर

श्रेष्ठ पटकथाकार मधुसूदन कालेलकर

Subscribe

जुन्या काळातली ही गाणी अजूनही लोकांच्या मनात रुजलेली आहेत या सगळ्याचे श्रेय जाते ते या गाण्यांच्या गीतकाराला म्हणजेच, मधुसूदन कालेलकर यांना. हिंदी-मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील नामवंत नाटककार, कथाकार, पटकथाकार आणि गीतकार म्हणून सर्वांना परिचित असलेले हे नाव.

‘निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई.’….आपलं बाळ झोपत नसेल तर आजही बाळाची आई हे गाणं म्हणते आणि ते बाळ शांत झोपी जातं. गणेशोत्सवात गणेशाची स्तुती करताना आजही, ‘तू सुखकर्ता तू दुखहर्ता’ हे गाणे भक्तिभावाने आळवले जाते. कधी प्रेयसी आपल्या रुसलेल्या प्रियकराला ‘सांग कधी कळणार तुजला भाव माझ्या मनातला’ असे म्हणून त्याच्या चेहर्‍यावर हास्य फुलवते. जुन्या काळातली ही गाणी अजूनही लोकांच्या मनात रुजलेली आहेत या सगळ्याचे श्रेय जाते ते या गाण्यांच्या गीतकाराला म्हणजेच, मधुसूदन कालेलकर यांना. हिंदी-मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील नामवंत नाटककार, कथाकार, पटकथाकार आणि गीतकार म्हणून सर्वांना परिचित असलेले हे नाव.

त्यांचा जन्म २२ मार्च १९२४ रोजी वेंगुर्ले येथे झाला. वेंगुर्ले येथे शालेय शिक्षण झाल्यावर ते मुंबईत आले. सुरुवातीस ते गिरगावात रामचंद्र बिल्डिंग (आताचे सुंदर भवन) मध्ये राहण्यास आले. तिथे गणेशोत्सवाच्या निमित्ताने त्यांनी त्यांचे पहिले नाटक लिहिले आणि आपल्या लिखाणाचा श्रीगणेशा केला. मग त्यांनी आपला निवास वांद्रे पश्चिममध्ये येवले भवन येथे हलवला. तेथे त्यांनी कित्येक वर्षे विपुल साहित्यसंपदा निर्मिली आणि तद्नंतर वांद्रे पूर्व येथील साहित्य सहवास वसाहतीत त्यांचे शेवटपर्यंत वास्तव्य राहिले. ते मराठी नाटककार, कथाकार आणि कवी म्हणून प्रसिद्ध झालेच पण त्याचबरोबर मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीत ते गीतकार आणि पटकथाकार म्हणूनही प्रथितयश झाले. कालेलकरांनी एकूण २९ नाटके आणि मराठी व हिंदी मिळून १११ चित्रपटांसाठी लिखाण केले. त्यात त्यांनी कौटुंबिक, गंभीर, विनोदी, सामाजिक असे अनेक विषय हाताळले आहेत. त्यांचे काही प्रमुख हिंदी चित्रपट ‘बात एक रात की,’ ‘ब्लफ मास्टर,’ ‘झुमरू,’ ‘फरार,’ ‘दुल्हन वही जो पिया मन भाये,’ ‘अखियों के झरोखों से,’ ‘गीत गाता चल,’ इत्यादि होते. त्यांनी चार नाटकांची निर्मिती केली. अनेक नाटकांचे गुजराती भाषेत प्रयोग झाले आणि होत आहेत, तर तीन ते चार नाटकांवर हिंदी व मराठीत चित्रपटही झाले आहेत.

- Advertisement -

फिल्म फेअर १९७८ चा सर्वोत्तम पटलेखनाचा पुरस्कार ‘दुल्हन वही जो पिया मन भाये’ या चित्रपटासाठी त्यांना देण्यात आला. महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवात त्यांना एकूण नऊ वेळा सर्वोत्तम कथा, पटकथा व संवाद यांसाठी ‘आम्ही जातो आमुच्या गावा’ (१९६४/६५-दुहेरी पुरस्कार), ‘पाहू रे किती वाट’ (१९६५/६६), ‘अपराध’ (१९६९/७०), ‘जावई विकत घेणे आहे’ (१९७३/७४), ‘अनोळखी’ (१९७४/७५), ‘गुपचूप गुपचूप’ (१९८३/८४), तसेच ‘बाळा गाऊ कशी अंगाई’ (१९७७/७८) या चित्रपटातील निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई या आजतागायत अंगाई म्हणून घरांघरांत सुपरिचित असलेल्या गीतासाठी सर्वोत्कृष्ट गीत लेखनाचे पारितोषिक देण्यात आले. त्यांच्या ‘अपराध मीच केला,’ ‘सागरा प्राण तळमळला’ व ‘शिकार’ ह्या नाटकांना महाराष्ट्र शासनाचे सर्वोत्कृष्ट साहित्यिक कलाकृतीचे पारितोषिक मिळाले. अशा या श्रेष्ठ नाटककार आणि पटकथाकाराचे १७ डिसेंबर १९८५ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -