घरफिचर्सआजचा दिनविशेष - शिवराज्याभिषेक सोहळा

आजचा दिनविशेष – शिवराज्याभिषेक सोहळा

Subscribe

गनिमी काव्याने मुघलांचे आक्रमण परतवून लावत छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची निर्मिती केली. या स्वराज्यातील पहिला सोहळा म्हणजे शिवराज्याभिषेक सोहळा.

क्षत्रियकुलावतंस छत्रपती शिवाजी महाराज

गनिमी काव्याने मुघलांचे आक्रमण परतवून लावत छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची निर्मिती केली. या स्वराज्यातील पहिला सोहळा म्हणजे शिवराज्याभिषेक सोहळा. छत्रपती शिवाजीराजे महाराज भोसले यांच्या शिवराज्याभिषेकाची तयारी कितीतरी महिने अगोदर सुरू झाली होती. राज्याभिषेकासाठी निश्चित अशी कोणती परंपरा नव्हती. प्राचीन परंपरा आणि राजनीतीवरील ग्रंथातून काही विद्वानांनी प्रथा-परंपरांचा अभ्यास केला. शिवराज्याभिषेकासाठी देशातील कानाकोपर्‍यांतून ब्राह्मणांना आमंत्रण देण्यात आले होते. सुमारे ११ हजार ब्राह्मण, यातील काही आपल्या कुटुंबीयांबरोबर आले होते. इतर लोक मिळून जवळपास लाखभर लोक रायगड या ठिकाणी जमा झाले होते. चार महिन्यांसाठी त्यांची राहण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. रोज त्यांना मिष्ठान्नाचे जेवण असे. ब्राह्मण, सरदार राज्यातील श्रीमंत गणमान्य व्यक्ती. दुसर्‍या राज्यांचे प्रतिनिधी, विदेशी व्यापारी आणि सामान्य जनता असे सर्वच या सोहळ्याला उपस्थित झाले होते. प्रत्येक दिवशी एका धार्मिक विधीत आणि संस्कारात शिवाजी महाराज गढून गेले होते. राजे शिवाजी यांनी सर्वप्रथम आपली आई जिजाबाईंना नमस्कार केला. त्यांचे आशीर्वाद घेतले.

- Advertisement -

त्यानंतर महाराजांनी विविध मंदिरांत जाऊन देवर्शन केले. चिपळूणला परशुराम यांचे दर्शन घेतले, पूजा केली आणि ते रायगडाला १२ मे १६७४ ला परत आले. तुळजापूरला भवानी मातेच्या दर्शनासाठी त्यांना जाणे शक्य नव्हते. म्हणून चार दिवसांनी ते प्रतापगडवरील प्रतिष्ठापना केलेल्या भवानीमाता देवीच्या दर्शनासाठी गेले. त्यावेळी सव्वा मण सोन्याची छत्री भवानी मातेस अर्पण केली. २१ मेला पुन्हा रायगडावर ते धार्मिक विधीत गुंतून गेले. महाराजांनी २८ मे ला प्रायश्चित्त केले. जानवे परिधान केले. दुसर्‍या दिवशी दोन राण्यांबरोबर पुन्हा विवाह विधी केला. त्यावेळी गागाभट्टांना ७ हजार होन तर इतर सर्व ब्राह्मणांना मिळून १७ हजार होन दक्षिणा दिली.

दुसर्‍या दिवशी महाराजांची सोने, चांदी, तांबे, जस्त, कथिल, शिसे आणि लोखंड अशा सात धातूंनी वेगवेगळी तुला झाली. याशिवाय वस्त्र, कापूर, मीठ, खिळे, मसाले, लोणी, साखर, फळे इत्यादींच्या तुला झाल्या. हे सर्व आणि शिवाय लाखभर होन ब्राह्मणांना देण्यात आले.

- Advertisement -

६ जून १६७४ रोजी राज्याभिषेक झाला. या दिवशी पहाटे उठून, मंत्रोच्चार आणि संस्काराबरोबर आंघोळ करून, कुलदेवतेला स्मरून, प्रमुख ब्राह्मणांच्या पायी पडून, राज्याभिषेक सुरू झाला. गागाभट्ट आणि इतर ब्राह्मणांना यावेळीही आभूषणे आणि वस्त्रे भेट देण्यात आली. यावेळी शिवाजी महाराजांनी शुभ्र वस्त्र परिधान केले होते. गळ्यात फुलांच्या माळा घातलेल्या होत्या. राज्याभिषेकात राजाचा अभिषेक आणि डोक्यावर छत्र धरणे हे दोन प्रमुख विधी होते. दोन फूट लांब दोन फूट रुंद अशा सोन्याने मढवलेल्या मंचावर शिवाजी महाराज बसले, शेजारी उपरण्याला साडीचे टोक बांधलेली सोयराबाई दुसर्‍या मंचावर, तर बालसंभाजी थोडेसे मागे बसले होते. अष्टप्रधानांतील आठ प्रधान, गंगेसारख्या विविध नद्यांतून आणलेले पाण्याचे जलकुंभ घेऊन उभे होते. त्यानंतर त्या जलकुंभांनी शिवाजी महाराजांवर अभिषेक केला. त्यावेळी मंत्रोच्चारण आणि आसमंतात विविध सुरवाद्य निनादत होते. सोळा सुवासिनींनी पंचारती ओवाळली. यानंतर शिवाजी महाराजांनी लाल रंगाचे वस्त्र परिधान केले. जडजवाहीर, अलंकार परिधान केले. गळ्यात फुलांचे हार घातले. एक राज मुकुट घातला. आपल्या ढाल तलवार आणि धनुष्यबाणाची पूजा केली. बरोब्बर मुहूर्ताच्या वेळी राजसिंहासनाच्या दालनात प्रवेश केला.

राज्यभिषेकाचे दालन हिंदू परंपरेनुसार ३२ शकुन चिन्हांनी सजवलेले होते. सभासद बखर म्हणते, त्याप्रमाणे ३२ मण सोन्याचे (१४ लाख रुपये मूल्य असलेले) भव्य सिंहासन सोन्याच्या पत्र्याने मढवलेले होते. शिवाजी महाराज सिंहासनावर आरुढ झाले. सोळा सवाष्णींनी त्यांना ओवाळले. ब्राह्मणांनी मोठ्या स्वरात मंत्रांचे उच्चारण केले. छत्रपती शिवाजी महाराजांना आशीर्वाद दिला. महाराजांनी त्यांना भेटवस्तू दिल्या. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’च्या घोषणा दिल्या गेल्या. सोन्याचांदीची फुले उधळली गेली. विविध तालवाद्य-सूरवाद्यांच्या जयघोषात आसमंत भरून गेले. ठरल्याप्रमाणे प्रत्येक गडावरून तोफा डागल्या गेल्या. मुख्य पुरोहित गागाभट्टांनी पुढे येऊन राजांच्या डोक्यावर मोत्याची झालर ठेवत ‘शिवछत्रपती’म्हणून आशीर्वाद दिला. इतर ब्राह्मण मंडळी पुढे झाली आणि त्यांनीही त्यांना आशीर्वाद दिले. राजे शिवाजी महाराजांनी ब्राह्मणांना आणि इतर सर्व जनांना खूप धन भेट म्हणून दिले. त्यांनी एकूण सोळा प्रकारचे महादान केले. त्यानंतर विविध मंत्रीगणांनी सिंहासनापुढे जाऊन राजांना अभिवादन केले. छत्रपतींनी त्यांना या प्रसंगी विविध पदे, नियुक्तीपत्रे, धन, घोडे, हत्ती, रत्ने, वस्त्रे, शस्त्रे दान केली. हे सर्व सकाळी आठ वाजेपर्यंत संपले. समारंभ संपल्यावर, छत्रपती शिवाजी महाराज पहिल्यांदा एका देखण्या घोड्यावर स्वार होऊन जगदीश्वराच्या मंदिराकडे गेले. तिकडून हत्तीवर स्वार होऊन त्यांची मिरवणूक रायगडावर निघाली. इतर दोन हत्तींवर जरीपटका आणि भगवा झेंडे घेऊन सोन्याचे प्रतिनिधी होते. सोबत अष्टप्रधान आणि इतर सैन्य होते. रायगडावर ही मिरवणूक जात असताना सामान्य जनांनी फुले, चुरमुरे उधळले, दिवे ओवाळले. रायगडावरील विविध मंदिरांचे दर्शन घेऊन महाराज महालात परतले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -