घरफिचर्सरणधुरंधर पहिले बाजीराव पेशवे

रणधुरंधर पहिले बाजीराव पेशवे

Subscribe

पहिले बाजीराव पेशवे हे मराठा साम्राज्याचे चौथे छत्रपती शाहू महाराज यांचे इ.स. १७२० पासून पेशवे (मुख्य प्रधान) होते. त्यांना थोरले बाजीराव किंवा पहिले बाजीराव या नावाने ओळखले जाते. त्यांचा जन्म १८ ऑगस्ट १७०० रोजी पुण्यात झाला. पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ भट हे बाजीरावांचे वडील. वडिलांच्या सानिध्यात बाजीराव बरेच काही शिकले. शिपाईगिरी करण्याची खुमखुमी त्यांच्यात लहानपणापासूनच होती. म्हणूनच बाळाजी विश्वनाथ हे दिल्लीच्या बादशहाची भेट घ्यायला गेले तेव्हा अवघ्या १९ वर्षांचे बाजीरावही त्यांच्याबरोबर होते. उत्तर हिंदुस्थानात मराठी सत्तेला हातपाय पसरायच्या किती शक्यता आहेत, याचा अदमास त्या कोवळ्या वयातच बाजीरावांनी घेतला होता. रणधुरंधर असलेल्या पहिल्या बाजीरावांनी आपल्या कुशल युद्धनेतृत्वाने छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापलेल्या मराठा दौलतीच्या सीमा उत्तर भारतात विस्तारल्या.

वेगवान हालचाल हा त्यांच्या युद्ध कौशल्याचा महत्वाचा भाग होता. त्यांनी केलेल्या सर्व मोठ्या लढाया जिंकल्या. बाळाजींच्या मृत्यूनंतर ‘पेशवेपदासाठी’ दरबारी लोकांत अहमहमिका लागली, त्यांत बाजीरावांना परंपरागत पेशवेपद देऊ नये असे इतर दरबारी म्हणू लागले. मात्र पडत्याकाळात इतर कोणाहीपेक्षा बाळाजींनी त्यांची जास्त काळजी घेतली होती त्यामुळे शाहू महाराजांचा बाजीरावांवर जीव होता. त्यांनी पेशवाईची वस्त्रे व शिक्के कट्यार पहिले बाजीराव यांना दिली.

- Advertisement -

बाजीराव अतिशय शूर होते. उण्यापुर्‍या ४० वर्षांच्या आयुष्यात त्यांनी अतुल पराक्रम गाजवला. १७२० मध्ये पेशवाई त्यांच्या कोवळ्या खांद्यावर आली. त्यांच्या मृत्यूपर्यंत म्हणजे २५ एप्रिल १७४० पर्यंत त्यांनी २० वर्षांत अनेक लढाया केल्या. त्यामध्ये ४७ मोठ्या लढायांचा समावेश आहे आणि सगळ्याच लढाया ते जिंकले. उभ्या भारतात बाजीरावांच्या समशेरीचा डंका वाजत होता. पहिल्या बाजीरावांनीच पुण्याला शनिवारवाडा बांधला आणि सातार्‍याच्या राजगादी इतकेच महत्व पुण्याला मिळवून दिले. बाजीराव पराक्रमी होते. त्यांच्याकडे दिलदारपणा होता, म्हणूनच शाहू महाराज म्हणत, ‘मला जर एक लाख फौज व बाजीराव यात निवड करण्यास सांगितले तर मी बाजीरावांची निवड करेन.’ एवढा एकच उद्गार बाजीरावांची योग्यता सिद्ध करतो. इतिहासाची पाने चाळली तरी इतिहास हेच सांगतो, वीस वर्षांच्या राजकीय आयुष्यात मराठ्यांच्या स्वराज्याचे साम्राज्यात रूपांतर करणे ही असामान्य घटना होय. त्यांच्यामुळे भारतीय उपखंडात राजकीय पुनर्रचना झाली. शिवरायांच्या स्वराज्याचा वटवृक्ष झाला. बाजीरावांनी कधीही देवधर्माचे अवडंबर केले नाही. जातीपातीच्या परिघात ते अडकले नाहीत.

बाजीरावांकडे कोणतेही छक्केपंजे नव्हते. नेपोलियनने जसे सामान्यांतून मार्शल निर्माण केले तसे बाजीरावांनी अठरापगड जाती-जमातीतून लढवय्ये सरदार निर्माण केले. संबंध भारतभूमीत स्फुल्लिंग पेटवले, अस्मिता निर्माण केली. अस्थिर झालेल्या स्वराज्याला त्यांनी स्थिर केले. एवढेच नाही तर स्वराज्याचा विस्तार केला. हिंदुस्थानच्या इतिहासात मराठ्यांना मानाचे स्थान मिळवून दिले. एवढा बळकट शनिवारवाडा बांधून ते त्यात कधीही विश्रांतीसाठी थांबले नाहीत. अशा या महान पेशव्याचे 28 एप्रिल 1740 रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -