मोहन धारिया हे भारताचे माजी केंद्रीय मंत्री व वनराई या संस्थेचे संस्थापक होते. त्यांचा जन्म १४ फेब्रुवारी १९२५ रोजी रायगड जिल्ह्यातील नाते या गावी झाला. त्यांचे वडील मूळचे गुजरातचे पण ते व्यवसायानिमित्त महाराष्ट्रात येऊन स्थायिक झाले होते. त्यांचे मॅट्रिक परीक्षेनंतर पुढील शिक्षण पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय येथे झाले. त्यांनी महाड येथे सेवादलात असताना वयाच्या १६व्या वर्षी १९४२ च्या स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला. त्यावेळी त्यांना शिक्षाही झाली होती.
पुणे विद्यापीठाची कायद्याची पदवी घेऊन ते मुंबई हायकोर्टात वकील झाले. त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी ‘लोकसेना’ नावाची संस्था सुरू केली. आपल्या नेतृत्व कौशल्याच्या जोरावर त्यांनी शेकडो तरुणांना संघटित केले. शिवाय वेगवेगळ्या संघटनांना एकत्र आणून त्यांनी पुण्यात ‘नॅशनल लेबर सेंटर’ ची स्थापना केली. ते १९५७ ते १९६० या काळात पुणे महापालिकेत नगरसेवक होते. १९६४ ते १९७० या काळात ते भारताच्या राज्यसभेचे सदस्य झाले. १९७१ ते १९७९ या काळात ते दोन वेळा लोकसभेचे सदस्य व १९७१ ते १९७५ या दरम्यान योजना, बांधकाम, गृहनिर्माण व नगरविकास या खात्यांचे राज्यमंत्री झाले.
पुढे केंद्रीय मंत्री झाल्यावर वाणिज्य, ताग, कापड, नागरी पुरवठा व सहकार या खात्यांची जबाबदारी त्यांच्याकडे होती. त्या वेळी रोजगार निर्मिती, लोकसंख्या, रास्त दरात अन्नधान्य, पायाभूत सुविधा यांसह विविध विषयांवर त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेऊन आपल्या कामाचा ठसा उमटवला. त्यांनी तयार व सादर केलेला ‘धारिया कमिटी रिपोर्ट’ हा शिक्षित बेरोजगारांसाठी एक महत्त्वाचा अहवाल स्वीकारला गेला. त्यांनी आणीबाणीच्या काळात तुरुंगवासही भोगला. तत्त्वासाठी मंत्रिमंडळाचा राजीनामा देणारे धारिया हे एकमेव मंत्री होते. त्यांनी १९८३ च्या सुमारास ‘वनराई’ या संस्थेची स्थापना केली. अशा या कर्तृत्ववान समाजसेवकाचे १४ ऑक्टोबर २०१३ रोजी निधन झाले.