घरफिचर्ससारांशविज्ञानयुगाची नांदी...

विज्ञानयुगाची नांदी…

Subscribe

तंत्रज्ञानाचा वापर करणार्‍या समाजामध्ये विज्ञानवादाचा असलेला अभाव अजून आपण सोळाव्या शतकातच वावरत असल्याचे दिसते तेव्हा वैज्ञानिक जयंत नारळीकर अस्वस्थ होतात. आज एकविसाव्या शतकातही फलज्योतिष, ग्रहांचे प्रभाव, पुराणकथांना खरं समजून चालणे अशा गोष्टींमुळे समाजाची प्रगती तर होत नाहीच, उलट तो अधोगतीकडे जातो आणि माणूस आपली विचार करण्याची शक्तीच हळूहळू गमावतो, असं नारळीकर आपल्या भाषणांतून, मुलाखतींतून, लिखाणातून सातत्याने मांडत आले आहेत. निरर्थक गोष्टींनाच विज्ञान समजून चालण्याच्या कालखंडात खर्‍या अर्थाने विज्ञानवादी होण्याची गरज आहे. नाशिक येथे होणार्‍या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी आंतरराष्ट्रीय किर्तीचे खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांची निवड झाल्यामुळे पुन्हा एकादा समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टीकोनाचा जागर होईल.

चार दिवसांपूर्वीची गोष्ट. नको चंद्र तारे, ऐकत घराबाहेरच्या अंगणात बसलो होतो. नभातील तारे माझ्याकडे पाहून हसत होते. तरीही मी त्यांच्याकडेच एकटक पाहण्यात दंग होतो. तेवढ्यात मोबाईलवर काहीतरी मेसेज आल्याचा आवाज झाला. मी लागलीच व्हॉट्सअ‍ॅप उघडून पाहिला. 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची ती बातमी होती. संमेलनाची मुहूर्त वेळ आधीच ठरली होती. अध्यक्षपद कोणाला मिळणार, हे अजून घोषित व्हायचं होतं. सर्वांना उत्सुकता लागून राहिली होती. कारण मोठंमोठी नावं अध्यक्षपदाच्या स्पर्धेत होती. मग शेवटी मतदान झालं आणि अखिल भारतीय मराठी साहित्य विश्वात एक इतिहास लिहिला गेला.

पहिल्यांदाच एक खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञानकथा लेखक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावर विराजमान होणार होता. ज्यांच्या रहस्यमय विज्ञानकथांनी माझ्यासारख्या अनेक तरुणांच्या बालमनावर विज्ञानाची जादुई कांडी फिरवली, अनेकांना विज्ञानाची गोडी लावली. आकाशगंगा, कृष्णविवर, टाईम मशिन, व्हायरस, यक्ष, अंतराळातील भस्मासूर हे एक विलक्षण आणि रहस्यमय विश्व आम्हा मुलांसमोर उभं केलं, ते आम्हा सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व डॉ. जयंत नारळीकर यांची साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावर झालेली निवड ही आम्हा सा़र्‍यांसाठीच एक अत्यानंदाची बातमी होती. कारण हा सन्मान एका युगपुरुषाचा आहे, जो समाजाला डोळसपणा येण्यासाठी अविरत लेखणीतून झिरपत राहिलाय. ही निवड नव्या विज्ञानवादाची नांदी आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरू नये.

- Advertisement -

विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात ज्यांनी विज्ञानकथांच्या माध्यमातून सर्वसामान्यांना विचारप्रवृत्त केलं, त्यात निरंजन घाटे, डॉ. जयंत नारळीकर ही नावं ठळकपणे समोर येतील. डॉ. नारळीकर हे नाव कोणा पुस्तकवेड्या मराठी माणसाला माहीत नाही, असं कधी होणार नाही. गुंतागुंतीचं विज्ञान त्यांनी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविलं. सोप्या शब्दांत विषयाचे मर्म उलगडून सांगायची वृत्ती आणि ऊर्मी यामुळे अनेकांनी विज्ञानाचा वसा घेतला. विज्ञानाला लोकप्रिय बनवण्यासाठी मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषांतून डॉक्टरांनी विपुल लेखन केलं. त्याचे विविध भाषांत अनुवादही झाले. प्रज्ञा, प्रतिभा आणि सर्जनशीलता यांचा एक सुरेख संगम नारळीकरांच्या ठायी घडून आलेला दिसतो. यामागे त्यांच्या आईवडिलांचं योगदानही महत्त्वाचं ठरतं. वडील बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित शाखेचे प्रमुख आणि आई संस्कृतविदुषी असल्याने घरात अभ्यास व अध्ययनाचेच वातावरण. अशातच नारळीकर बनारसमधून पहिल्या क्रमांकाने पदवी उत्तीर्ण झाले आणि पुढील शिक्षणासाठी त्यांनी थेट केंब्रिज गाठलं. तिथे बी. ए., एम. ए., पी. एच.डी. आणि वडिलांप्रमाणे रँग्लर या पदव्या मिळवल्या.

खगोलशास्त्राचे महत्त्वपूर्ण टायसन मेडल, स्मिथ पुरस्कार यासारखे अनेक पुरस्कार नारळीकरांनी खडतर मेहनतीने प्राप्त केले. खगोलशास्त्राला नवी दिशा देणारा गुरुत्वाकर्षणाचा नवा ‘स्थिर स्थिती सिद्धांत’ त्यांनी आपले गुरु सर फ्रेड हॉइल यांच्यासोबत मांडला. तो ‘हॉइल-नारळीकर’ सिद्धांत म्हणून खगोलविश्वात प्रसिद्ध पावला. परदेशात जरी त्यांनी संशोधन केलं, तरी नारळीकर कधीच परदेशी पाहुणे झाले नाहीत. संशोधन पूर्ण झाल्यावर त्यांनी मुंबईच्या टाटा मूलभूत संशोधन संस्थेत संशोधन सुरू ठेवले. जगातील संशोधकांना मार्गदर्शक ठरणार्‍या पुण्यातील ‘आयुका’ या संशोधन संस्थेची स्थापना केली. हे सारं पाहिल्यावर, वाचल्यावर पहिल्याच पुस्तकाला (यक्षांची देणगी) महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळविणारे डॉ. नारळीकर जेव्हा वयाच्या अवघ्या अठ्ठावीसाव्या वर्षी पद्मभूषण पुरस्कार प्राप्त करतात, हे वाचून नवल वाटणार नाही.

- Advertisement -

लहानपणी आमच्या मराठी शाळेतील गुरुजींनी आम्हाला एक गाणं अगदी तालासुरात गाऊन शिकवलं होतं. ‘डोळे उघडून बघा मुलांनो झापड लावू नका. भवतालीचे विश्व कोणत्या सूत्राने चाले? कोण बोलतो राजा आणिक कुठले दळ आले? या दुनियेचे मर्म न कळता जगणे केवळ फुका! जे दिसते ते असेच का हे उलगडण्याला शिका…’ हे माझं अतिशय आवडतं गाणं. तेव्हा या गाण्याचा अर्थ काही एवढा समजला नव्हता; पण जेव्हा नारळीकर सरांच्या कथा वाचनात येऊ लागल्या, तेव्हा खरोखर डोळे उघडू लागले. चंद्र म्हणजे काय, तर आमचा मामा. रात्री झोप लागत नसली, की आई आभाळातल्या एका ग्रहाकडे बोट दाखवून म्हणते, ‘तो बघ वर दिसतोय ना, त्याला चांदोमामा असं म्हणतात.’ असं नकळत त्या अजैविकाशी एक नातं जोडलं जातं. इतकं सोप्पं असतं आयुष्य म्हणजे. पण ते सोपं का वाटतं? कारण आपण अज्ञानी असतो. खरंखोटं काही समजत नसतं; पण जेव्हा समजतं, की चंद्र हा आपला मामा नाही. तो एक ग्रह आहे. जो पृथ्वीभोवती फिरत असतो. तेव्हा त्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो. आमच्यातील एखाद्या प्रेमवीराला त्याच्या प्रेयसीच्या मुखकमलावर चंद्रमेळा भरलेला दिसतो.

पण जेव्हा त्याला समजेल, की चंद्रावर कितीक खड्डे, काळीकुट्ट विवरे आहेत, तेव्हा कदाचित त्याची प्रेयसीबद्दलची उपमा बदलेल. असं कल्पनाविश्वातलं जगणं आणि खर्‍याखुर्‍या गोष्टी लक्षात घेऊन जगणं, यात जमीनअस्मानाचा फरक असतो. तो फरक आम्हाला कळण्यामागे डॉ. नारळीकरांचा खूप मोठा वाटा आहे. ‘जे दिसते ते असेच का?’ याचं उत्तर नारळीकरांची पुस्तकं वाचताना मिळतं. विश्व म्हणजे काय? तर तो एक अवाढव्य प्राणी असेल का? आणि आपले ग्रह, तारे त्याच्या पेशी? आत वावरणारे आम्ही जीव म्हणजे जीवाणू, विषाणू आणि त्याचं रक्त म्हणजे हा काळाकुट्ट अंधार…? असे अनेक प्रश्न उत्पन्न करणारी नजर ही डॉ. नारळीकरांचीच देणगी. हॉलिवूडच्या ‘सायंस फिक्शन’ च्या चित्रपटांपेक्षा या कथांचं विश्व खूप अद्भूत आहे. लहानपणी चांदोबा, चंपक, ठकठक यासोबतच ज्यानं ‘चला जाऊ अवकाश सफरीला’, ‘यक्षांची देणगी’, ‘याला जीवन ऐसे नाव’ अशांसारखी पुस्तकं वाचली असतील, त्यानं खरंच खूप मोठा खजिना लहानपणीच साठवून ठेवलाय, असंच म्हणायला हवं.

‘विज्ञान आणि मातृभाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. सुटसुटीत मराठी शब्द वापरले पाहिजेत. मराठीला जागतिक भाषेच्या दर्जाला न्यायचे असेल, तर मराठीचा अधिकाधिक वापर झाला पाहिजे.’ असे उद्गार जेव्हा एखादा जागतिक दर्जाचा शास्त्रज्ञ आणि लेखक तळमळीने काढतो, तेव्हा त्यातली तळमळ जाणवायला हवी. नारळीकरांचं प्राथमिक शिक्षण हिंदीतून आणि नंतर डॉक्टरेटपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून झालं. तरीही त्यांचा आपल्या मातृभाषेकडे असलेला ओढा कधीच आटला नाही. कदाचित यामुळे तो अधिकच प्रवाहित झाला असेल. विज्ञान शिक्षण मातृभाषेतूनच दिलं पाहिजे, असं नारळीकरांचं मत. कारण इतर भाषेतून मिळणार्‍या शिक्षणामुळे कल्पनांना हवा तसा वाव मिळत नाही. इतर भाषेतून शिक्षण दिल्याने मुलांना आपल्या मातृभाषेबद्दल आपुलकी उरत नाही. त्यामुळे ती त्या भाषेपासून दुरावत जातात. त्या भाषेला मिळणारा वाचक वर्ग कमी होतो. हिच स्थिती सध्या मराठीच्या पदरी आलीय, याकडे नारळीकर लक्ष वेधून घेतात. त्यामुळे सर्वसामान्यांत विज्ञान रुजवण्यासाठी ते मराठीतून अविरत लिहित आहेत.

तंत्रज्ञानाचा वापर करणार्‍या समाजामध्ये विज्ञानवादाचा असलेला अभाव अजून आपण सोळाव्या शतकातच वावरत असल्याचा भास नारळीकरांना जाणवून देतो, तेव्हा ते अस्वस्थ होतात. आज एकविसाव्या शतकातही फलज्योतिष, ग्रहांचे प्रभाव, पुराणकथांना खरं समजून चालणे अशा गोष्टींमुळे समाजाची प्रगती तर होत नाहीच, उलट तो अधोगतीकडे जातो आणि माणूस आपली विचार करण्याची शक्तीच हळूहळू गमावतो, असं नारळीकर आपल्या भाषणांतून, मुलाखतींतून, लिखाणातून सातत्याने मांडत आले आहेत. अशा निरर्थक गोष्टींनाच विज्ञान समजून चालण्याच्या कालखंडात खर्‍या अर्थाने विज्ञानवादी होणे, सत्य तपासणे आणि नंतर ते स्वीकारणे, हा दृष्टीकोन रुजण्याची गरज आहे. साहित्यातून तो दृष्टीकोन रुजवता येतो. अंधश्रद्धा दूर करण्यासाठी साहित्यातून आपण प्रयत्न करू शकतो. व्याख्याने, प्रदर्शने, कार्यशाळा, विज्ञान कथा अशा विविध माध्यमांतून समाजामध्ये वैचारिक दृष्टीकोनाचा प्रसार करू शकतो. हे डॉ. नारळीकरांचं मत जेव्हा आपण ऐकतो, तेव्हा बुवा-बापूंची असंस्कृत पिलावळ पिसाटून वाहत असण्याच्या या काळात ही निवड किती आधार देणारी आहे, याचा अंदाज येऊन जातो.

पुराव्यांशिवाय विज्ञान असत नाही आणि ज्यांना पुरावे नसतात ते विज्ञान असत नाही, असं मानणार्‍यांपैकी डॉ. जयंत नारळीकर हे एक नाव. ‘माकड हा आमचा पूर्वज नव्हता. विश्वाच्या निर्मितीबद्दल आमच्या वेदांत आधीच लिहिलेलं होतं. सा़र्‍या विश्वाचं, सार्‍या शोधांचं मूळ हे आमच्या आर्यावर्तात होतं,’ असं छातीठोकपणे सांगणार्‍या महत पंडितांनी त्याचे खरे पुरावे आधी गोळा करावेत, असं डॉक्टर स्पष्टपणे सांगतात. परंतु अशा पंडितांशी वादविवाद करण्यात वेळ खर्ची घालण्यापेक्षा आपलं संशोधन ते आधिक जोमानं सुरू ठेवतात. पुराणकथांना तोड म्हणून विज्ञानकथा लिहितात. त्या तितक्याच प्रामाणिकपणे वाचकांसमोर मांडतात. त्यातून कणभराने का होईना, डोळस वाचक त्याकडे गांभीर्यानं पाहतो. मग त्या पंडितांना प्रश्न विचारण्याची ताकद या सर्वसामान्य रयतेत निर्माण होते. यामागे जेवढा भाग विज्ञानाचा आहे, तेवढाच ते विज्ञान तळागाळापर्यंत पोहोचविणार्‍या नारळीकरांसारख्या शास्त्रज्ञाचा प्रामुख्याने लेखकाचाही आहे.

एखादा विषय सोपा करून सांगण्याची शैली तेव्हाच येते, जेव्हा तो विषय सखोलपणे समजलेला असेल. नारळीकरांचं लिखाण वाचताना त्यातून ही परिपूर्णतेची झळाळी कायमच लख्खपणे जाणवत राहते. लहान मुलांमध्ये विज्ञाननिष्ठा जागृत करणे, हे मुख्य ध्येय मानून ते आजही विज्ञानकथा लिहित आहेत. कोणत्याही प्रश्नाचं उत्तर शिक्षक आणि मुले असं दोघांनीही मिळून शोधायला हवं. त्यामुळे दोघांनाही शिकण्याची प्रेरणा मिळत असते, असं नारळीकर म्हणतात. पद्मभूषण सोबतच पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण, भटनागर, एम. पी. बिर्ला पुरस्कार, फाय फाऊंडेशन, इचलकरंजीमार्फत राष्ट्रभूषण पुरस्कार, दिल्लीच्या साहित्य अकादमीचा पुरस्कार, अमेरिकेतील फाऊंडेशनमार्फत दिला जाणारा साहित्यविषयक जीवनगौरव पुरस्कार असे अनेक मानाचे पुरस्कार मिळविणार्‍या डॉ. जयंत नारळीकरांची साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी झालेली निवड हा त्यांच्या वैज्ञानिक आणि साहित्यिक कामगिरीचा गौरव आहे, असंच म्हणायला हवं.

‘चार नगरांतले माझे विश्व’ असं म्हणणारा ‘आयुका’तला हा विज्ञानमहर्षी आज मराठी सारस्वताच्या दरबारात सर्वोच्च पदावर विराजमान होण्यासाठी प्रस्थान करत आहे. हा खरोखरच सार्‍या मराठी विज्ञानयुगाचा नवा अध्याय असेल. वैज्ञानिक दृष्टीकोनाचा मोठा सन्मान असेल. ‘सा़र्‍याच साहित्य संमेलनात विज्ञानकथांना back door entry आणि back door exit असते,’ ही त्यांच्याच मनातील खंत आता सर्वार्थाने दूर होईल. लहान मुलांचं वैज्ञानिक मनोरंजन करत प्रभूशी नाते जोडणारा हा अवलिया आता मराठी साहित्य विश्वालाही नव्या उंचीपर्यंत नेवो, हिच एक आशा.

‘हे अवकाशस्थ शक्तींनो, या. आर्यभट्टापासून गॅलिलिओ आणि सॉक्रेटिसपासून हॉकिंगपर्यंतच्या सार्‍या देवदूतांनो या. या नव्या विज्ञानयुगाच्या नांदीचे आम्हा पामरांसोबत तुम्हीही साक्षीदार व्हा… नव्या विज्ञानयुगाचा नवा सूर्य पाहूया…

-श्रेयश शिंदे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -