घरफिचर्ससारांश‘होळी’ सणाचे पावित्र्य राखूया!

‘होळी’ सणाचे पावित्र्य राखूया!

Subscribe

होलिकोत्सव साजरा करताना घडणार्‍या अपप्रकारांना रोखण्यासाठी दरवर्षी पोलिसांना आदेश द्यावे लागतात, याची खरंतर आपल्याला लाज वाटायला हवी. हिंदू धर्मातील प्रत्येक सण आणि उत्सव यामागे लोककल्याणाचा आणि सामाजिक एकोप्याचा उदात्त हेतू दडलेला आहे. होळीसारख्या पवित्र सणामध्ये शिरलेल्या गैरप्रकारामुळे या दिवसांत अनेक जण घराबाहेर पडणे टाळू लागले आहेत. सणांमागील शास्त्र लक्षात घेऊन ते साजरे केल्यास मनुष्याला त्यातून आनंद मिळतो, मात्र होळीसारख्या पवित्र सणाला आलेले ओंगळवाणे स्वरूप पाहता आपणच आपल्या धर्माची अवहेलना करीत आहोत हे लक्षात घ्यायला हवे.

-जगन घाणेकर

दुष्प्रवृत्ती आणि अयोग्य विचार यांची होळी करून सत्प्रवृत्ती जोपासण्याचा संकल्प करण्याचा सण म्हणजे होळी. भारतात स्थानपरत्वे हा सण साजरा करण्याच्या पद्धतीही भिन्न भिन्न असल्याच्या पाहायला मिळतात. होळी साजरी करण्यामागील कथाही राज्यानुसार आणि चालीरीतीनुसार वेगवेगळ्या सांगितल्या जातात. काही प्रदेशात होळीला अधिक महत्त्व दिले जाते, तर काही ठिकाणी होळीनंतर येणार्‍या रंगपंचमीला. गेल्या काही वर्षांत शहरांच्या ठिकाणी होळी सणामध्ये गैरप्रकारांचा मोठ्या प्रमाणात शिरकाव झालेला पाहायला मिळतो, ज्यामुळे या सणाचे पावित्र्य कुठेतरी कमी होऊ लागले आहे.

- Advertisement -

होळीचे निमित्त करून आठवडाभर आधीपासूनच इमारतींच्या गच्चीवरून, रेल्वेगाड्या, बसेसवर पाण्याने भरलेले फुगे, प्लास्टिक पिशव्या फेकून मारल्या जातात. यामध्ये शालेय आणि महाविद्यालयीन मुलींसह नोकरी व्यवसायानिमित्त घराबाहेर पडणार्‍या तरुणींना खासकरून लक्ष्य केले जाते. दरवर्षी केवळ पाण्याने भरलेले फुगे मारण्यामुळे कितीतरी अपघात घडतात, कितीतरी जणांना डोळे गमवावे लागतात, तर कित्येकांना कायमस्वरूपी अपंगत्व येते. मागील ५-६ वर्षांपासून होळीच्या निमित्ताने फुग्यांना पर्याय म्हणून पातळ प्लास्टिक पिशव्या विक्रीसाठी बाजारात येऊ लागल्या आहेत.

धुलिवंदनाच्या दिवशी दुपारीच या प्लास्टिक पिशव्यांचा खच रस्त्यावर साचलेला पाहायला मिळतो. हवेसोबत उडत जाऊन या पिशव्या नाल्यांत आणि गटारांत साचतात. २६ जुलै २००५ या दिवशी मुंबईत महाप्रलय आला होता, ज्याला मुख्यत्वे कारणीभूत प्लास्टिक पिशव्याच होत्या. वर्षभर प्लास्टिक निर्मूलनासाठी प्रयत्न करणारे पालिका प्रशासन होळीच्या दिवसांत मोठ्या प्रमाणात वितरित होणार्‍या प्लास्टिक पिशव्यांवर कायदेशीर कारवाई करताना कुठे दिसत नाही.

- Advertisement -

काही ठिकाणी परस्परांतील वैमनस्य काढण्यासाठी इतरांच्या वस्तू चोरून त्या होळीत जाळल्या जातात. होळीच्या ठिकाणी बोंब मारण्याची प्रथा पूर्वापार चालत आली आहे, मात्र हल्ली या प्रथेच्या आड कुणाचे तरी नाव घेऊन घाणेरड्या शिव्या घातल्या जातात. धुलिवंदनाच्या दिवशी एकमेकांना रासायनिक रंग फासले जातात, ज्यामुळे बर्‍याचदा गंभीर स्वरूपाचे त्वचाविकार होतात. नासकी अंडी फेकून मारली जातात, मद्यपान करून रस्त्यावर धिंगाणा घातला जातो. महिलांना पाहून अश्लील शेरेबाजी केली जाती.

लोकांना आणि गाड्या अडवून जबरदस्तीने पैसे उकळले जातात. या अपप्रकारांना रोखण्यासाठी दरवर्षी पोलिसांना शासनाकडून आदेश द्यावे लागतात, याची खरंतर आपल्याला लाज वाटायला हवी. हिंदू धर्मातील प्रत्येक सण आणि उत्सव यामागे लोककल्याणाचा आणि सामाजिक एकोप्याचा उदात्त हेतू दडलेला आहे. होळीसारख्या पवित्र सणामध्ये शिरलेल्या गैरप्रकारामुळे या दिवसांत अनेक जण घराबाहेर पडणे टाळू लागले आहेत. सणांमागील शास्त्र लक्षात घेऊन ते साजरे केल्यास मनुष्याला त्यातून आनंद मिळतो, मात्र होळीसारख्या पवित्र सणाला आलेले ओंगळवाणे स्वरूप पाहता आपणच आपल्या धर्माची अवहेलना करीत आहोत हे लक्षात घ्यायला हवे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -