घरफिचर्सनटश्रेष्ठ प्रभाकर पणशीकर

नटश्रेष्ठ प्रभाकर पणशीकर

Subscribe

प्रभाकर पणशीकर तथा पंत यांचा आज स्मृतीदिन. त्यांचा जन्म मुंबईत १४ मार्च 1931 रोजी झाला. पणशीकर हे मराठी रंगभूमीवरील अभिनेते, दिग्दर्शक आणि नाट्यनिर्माते होते. प्रल्हाद केशव अत्रे लिखित ‘तो मी नव्हेच’ या नाटकात साकार केलेल्या पाच वेगवेगळ्या भूमिकांमुळे ते संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झाले. ‘इथे ओशाळला मृत्यू’ या संभाजी महाराजांच्या मृत्यूवर आधारित नाटकातील औरंगजेबाची भूमिका त्यांनी केली. त्यांनी स्थापन केलेल्या नाट्यसंपदा या नाट्यंसंस्थेचे ‘कट्यार काळजात घुसली’ हे संगीतनाटक विशेष लोकप्रिय झाले.

प्रभाकर पणशीकरांनी त्यांच्या 50 वर्षांच्या कलाक्षेत्रातील कारकिर्दीत नाटकांचे सुमारे 8000 च्या वर प्रयोग केले. मराठीसोबतच गुजराती व कन्नड भाषेतही त्यांनी अभिनय केला. 4 मराठी चित्रपट, 4 मराठी मालिका यांसोबतच एक इंग्रजी मालिका केली आणि रेडिओसाठी तर असंख्य नाट्यवाचने केली. पणशीकरांचा जन्म मुंबईत फणसवाडी येथे वेदविद्यासंपन्न ब्राह्मण कुटुंबात झाला. पंतांचे वडील विष्णुशास्त्री हे दशग्रंथी ब्राह्मण होते, तर त्यांचे आजोबा वासुदेवशास्त्री हे संस्कृत प्रकांड पंडित होते.

- Advertisement -

लहानग्या प्रभाकरचा ओढा मात्र नाट्यक्षेत्राकडे होता. शाळेत असताना वेगवेगळ्या प्रसिद्ध नाटक कंपन्यांची नाटके त्यांनी पाहिली. एवढेच नव्हे तर ती नाटके पुढे गिरगावात गणेशोत्सवात सादर केली. त्यामुळे पौगंडावस्थेतच त्यांना घरापासून दूर जावे लागले. 13 मार्च 1955 या दिवशी ‘राणीचा बाग’ या नाटकाद्वारे पणशीकरांनी मराठी रंगभूमीवर प्रवेश केला. वयाच्या पंचवीशीत त्यांनी लेखक-दिग्दर्शक मो.ग.रांगणेकरांच्या ‘नाट्यनिकेतन’ या संस्थेत प्रवेश केला आणि ‘कुलवधू’, ‘भूमिकन्या सीता’, ‘वहिनी’, ’खडाष्टक’ अशा नाटकांमधून कामे करण्यास सुरुवात केली.

1962 साली रांगणेकरांनी जेव्हा अत्र्यांचे ‘तो मी नव्हेच’ हे नाटक सादर करायचे ठरवले तेव्हा अत्र्यांनी सुचवलेली अन्य नटांची नावे धुडकावून रांगणेकरांनी पणशीकरांना मुख्य भूमिका करण्याचा आग्रह केला. त्यांनी ती अर्थातच मान्य केली आणि 15 ऑगस्ट 1962 ला ‘तो मी नव्हेच’चा मुहूर्ताचा प्रयोग झाला. या नाटकात पंतांनी लखोबा लोखंडे, दिवाकर दातार, दाजीशास्त्री दातार, कॅप्टन अशोक परांजपे आणि राधेश्याम महाराज अशा पाच वेगवेगळ्या वृत्ती-प्रवृत्तीच्या भूमिका, काही क्षणांत भूमिकाबदलांसह साकारायचे शिवधनुष्य लीलया पेलले.

- Advertisement -

पुढे मो.ग.रांगणेकरांशी मतभेद झाल्यानंतर पंत ‘नाट्यनिकेतन’मधून बाहेर पडले आणि ‘अत्रे थिएटर्स’मधून ‘तो मी नव्हेच’चे प्रयोग सादर करू लागले. आपले स्नेही मोहन वाघ आणि वासुदेव कोल्हटकर यांच्या मदतीने त्यांनी 1963 साली ‘नाट्यसंपदा’ या संस्थेची स्थापना केली. विद्याधर गोखले लिखित ‘अमृत झाले जहराचे’ आणि वसंत कानेटकर यांचे ‘मोहिनी’ अशी दोन नाटके ‘नाट्यसंपदे’ने रंगमंचावर आणली. दुर्दैवाने ती फारशी चालली नाहीत.

मात्र त्यानंतरच्या ‘मला काही सांगायचंय’ आणि विशेषत: ‘इथे ओशाळला मृत्यू’ या नाटकांच्या निर्मितीने ृ‘नाट्यसंपदे’ला स्थैर्य, आर्थिक यश आणि प्रसिद्धी मिळवून दिली. ‘कट्यार काळजात घुसली’ या सुप्रसिद्ध संगीत नाटकाने तर इतिहास घडवला. ‘नाट्यसंपदा’ने त्यांची‘अश्रुंची झाली फुले’, ‘कट्यार काळजात घुसली’ आणि ‘संत तुकाराम’ ही तीन नाटके एकाच दिवशी तीन नाट्यगृहांत लावून एक न मोडण्यासारखा विक्रम प्रस्थापित केला. अशा या अलौकिक प्रतिभा लाभलेल्या अभिनेत्याचे निधन पुण्यात १३ जानेवारी २०११ रोजी झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -