घरमहाराष्ट्रगुढीपाडवा, बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त 100 रुपयांत 'आनंदाचा शिधा', मंत्रिमंडळाचा निर्णय

गुढीपाडवा, बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त 100 रुपयांत ‘आनंदाचा शिधा’, मंत्रिमंडळाचा निर्णय

Subscribe

मुंबई : गुढीपाडवा तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना 100 रुपयांत ‘आनंदाचा शिधा’ देण्याचा निर्णय आज, बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. याचा लाभ राज्यातील 1 कोटी 63 लाख शिधापत्रिकाधारकांना होईल. यापूर्वी दिवाळीत ‘आनंदाचा शिधा’ देण्यात आला होता.

- Advertisement -

अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब तसेच औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व आणि नागपूर विभागातील वर्धा अशा 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील केशरी शेतकरी शिधा पत्रिकाधारकांना 1 किलो रवा, 1 किलो चणाडाळ, 1 किलो साखर आणि 1 लिटर पामतेल असा ‘आनंदाचा शिधा’ गुढी पाडव्यापासून पुढील एक महिन्याच्या कालावधीसाठी ई-पॉसद्वार 100 रुपये प्रतिसंच अशा दरात दिला जाणार आहे. ई-पॉसची व्यवस्था नसलेल्या ठिकाणी ऑफलाइन पद्धतीने हा शिधा दिला जाईल.

‘आनंदाचा शिधा’ देण्याकरिता आवश्यक जिन्नसांची खरेदी करण्याकरिता महाटेंडर्स या ऑनलाइन पोर्टलद्धारे 21 दिवसांऐवजी 15 दिवसांच्या कालावधीत निविदा प्रक्रिया राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. 2022मध्ये दिवाळी सणानिमित्त शिधाजिन्नस खरेदीसाठी पार पडलेल्या निविदा प्रक्रियेत 279 प्रति संच या दरानुसार 455 कोटी 94 लाख आणि इतर संबंधित खर्चासाठी 17 कोटी 64 लाख अशा 473 कोटी 58 लाख इतक्या खर्चास देखील मान्यता देण्यात आली होती. तथापि, त्यावेळी अनेक ठिकाणी दिवाळी झाल्यानंतरही हा आनंदाचा शिधा उपलब्ध झाला नव्हता. त्यावर ‘आपली दिवाळी तुळशीच्या लग्नापर्यंत असते, तोपर्यंत आनंदाचा शिधा घरोघरी नक्की पोहोचेल,’ अशी सारवासारव सरकारने केली होती. त्यामुळे बहुधा यावेळी महिनाभर आधीच हा निर्णय घेण्याता आला आहे.

- Advertisement -

उर्ध्व प्रवरा प्रकल्पाच्या कामास गती
अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यामधील उर्ध्व प्रवरा प्रकल्पाच्या कामास गती देण्यासाठी 5177.38 कोटींच्या खर्चास सुधारित मान्यता देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. यामुळे 68 हजार हेक्टर जमिनीला सिंचनाचा थेट लाभ होणार आहे.

प्रवरा नदीवर निळवंडे गावाच्या वरील बाजूस हे दगडी धरण बांधण्यात येत असून धरणातून डावा कालवा सुरू होऊन तो 85 किमी लांब आहे. नदीच्या उजव्या तीराने जाणारा कालवा 97 किमी आहे. या दोन्ही कालव्यातून 68 हजार हेक्टर सिंचन होणे अपेक्षित आहे. 2027पर्यंत या प्रकल्पाचे कालव्यासह संपूर्ण बांधकाम पूर्ण करण्यात येणार आहे. हा प्रकल्प पूर्ण होताच अकोले, संगमनेर, राहुरी, राहाता, कोपरगाव तसेच नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्याच्या अवर्षणप्रर्वण भागातील 182 गावांना सिंचनाचा लाभ होईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -