मुंबईः 500 चौरस फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ करत असल्याची मोठी घोषणा ठाकरे सरकारनं केलीय. गेल्या काही दिवसांपासून गायब असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेला गिफ्ट दिलं. त्यानंतर आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयावर टीका केलीय. 2017 चे वचन पूर्ण करण्यासाठी 2022 निवडणुकीचे वर्ष उजाडले, देर आए दुरुस्त आए… !, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय.
दुसरीकडे नगरविकास विषयक ऑनलाईन बैठक आज पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख व्हीसीद्वारे बैठकीला उपस्थित होते. या बैठकीनंतर एकनाथ शिंदेंनी ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ करत असल्याची घोषणा केलीय. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनीही या निर्णयाची लवकरात लवकर अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. या निर्णयामुळे १ हजार कोटींचा तोटा महापालिकेला होणार आहे. एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात मुंबईकरांचा ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करत असल्याचं सांगितलं. सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देत आहोत. या निर्णयाचा १६ लाख कुटुंबांना लाभ होईल. मुंबईकरांसाठी महत्वाकांक्षी आणि क्रांतीकारी निर्णय असल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले.
शिवसेनेने मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये महापालिकेवर आमची सत्ता आली की, आम्ही ५०० चौरस फुटांच्या घरावरील मालमत्ता कर सरसकट माफ करु. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये याबद्दल प्रश्न विचारला असता एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत याबद्दल महापालिकेचा प्रस्ताव आला आहे आणि त्याबद्दल काम देखील सुरू आहे, अशी माहिती दिली होती.
2017 चे वचन पूर्ण करण्यासाठी अखेर 2022 हे निवडणुकीचे वर्ष उजाडले!
देर आए दुरुस्त आए… !#Mumbai #taxrelief #tax https://t.co/kd3MmBMrWG
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 1, 2022
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रशासनाला सूचना
नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वसामान्य मुंबईकरांना मोठी भेट दिली असून, ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरावरील मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला. तसेच या निणर्याची तत्काळ अंमलबजावणी करा, अशा सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या. या निर्णयामुळे साधारणत: १६ लाख कुटुंबांना लाभ होईल.