महाराष्ट्रातील राजकारण सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. एकीकडे शिवसेनेचे फायर ब्रँड नेते खासदार संजय राऊत 100 दिवसांनी तुरुंगावासातून जामीनावर बाहेर पडले. ज्यामुळे शिवसेनेच्या ठाकरे गटात एक नवी ऊर्जा संचारली आहे. तर दुसरीकडे राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाखालील काँग्रेसची भारत जोडो यात्रा नांदेडमधून आता हिंगोलीत दाखल झाली आहे. एकूण या घटनांमधून राज्यातील सत्ताधारी शिंदे- फडणवीस सरकार आणि केंद्रीतील मोदी सरकारला जेरीस आणण्याचे प्रयत्न सुरु झाले आहे. राहुल गांधी यांच्या यात्रेला महाराष्ट्रातून मोठ्याप्रमाणात प्रतिसाद मिळतोय. अशा परिस्थितीत आज ठाकरे गटाचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनीही काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला साथ दिली आहे. कन्याकुमारीपासून सुरु झालेली ही यात्रा काश्मीरपर्यंत जाणार आहे. ही पदयात्रा आहे. या निमित्ताने आज गांधी आणि ठाकरे कुटुंबातील दोन तरुण राजकीय नेते प्रथमचं एकत्र दिसले. काँग्रेस नेत्यांनी उद्धव ठाकरे यांनाही या यात्रेत सहभागी होण्याचं निमंत्रण दिले होते. मात्र त्यांच्यावतीने आज आदित्य ठाकरे या यात्रेत सहभागी झाले आहेत.
अन्याय के ख़िलाफ़ हम एक हैं – हक़ के लिए मिल कर आवाज़ उठाएंगे – कंधे से कंधा मिलाएंगे – भारत जोड़ते जाएंगे।
इस क्रांति से जुड़ने के लिए साधुवाद @AUThackeray#BharatJodoYatra pic.twitter.com/WTDJnoVyPs
— Congress (@INCIndia) November 11, 2022
यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधी प्रत्येक राज्यातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत थेट पोहचण्याचा आणि त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळत असल्याचेही यातून दिसतेय, कारण या यात्रेदरम्यान खरोखरचं सर्वसामान्य नागरिक येऊन राहुल गांधींची गळाभेट घेत त्यांना आपल्या समस्या सांगत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात तरी भारत जो़डो यात्रा जशी पुढे सरकतेय तसा नागरिकांचा प्रतिसादही वाढतोय. विशेष म्हणजे राहुल गांधी यांच्या या भारत जोडो यात्रेत काँग्रेसचा मित्रपक्ष असलेला शिवसेना पक्षही आज सहभागी झाला आहे.
शिवसेनेचे युवासेना नेते आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेना नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी आमदार सचिन अहिर यांनीही आज या यात्रेत सहभाग घेतला. भारत जोडो यात्रा आज नांदेडमधून हिंगोलीत पोहोचली. यावेळी शिवसेना युवासेना नेते आदित्य ठाकरे राहुल गांधी यांच्यासोबत यात्रेत पायी चालू लागले.
राहुल गांधी यांच्या यात्रेचा आज 65 वा दिवस आहे. तर महाराष्ट्रातला पाचवा दिवस आहे. दरम्यान काल हिंगोलीत राहुल गांधींच्या या यात्रेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नेते सहभागी झाले होते. ज्यात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार जितेंद्र आव्हाड, दिलीप वळसे पाटील आदी नेते या यात्रेत सहभागी झाले होते. त्यानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि राज्याचे माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे देखील या यात्रेत सहभागी झाले आहेत. तर काही हिंदी कलाकारांनीही या यात्रेस पाठिंबा दर्शवला. त्यामुळे या यात्रेला महाराष्ट्रातही चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय. या यात्रेत पुरुषांसह महिला आणि लहान मुलांचा मोठा सहभाग दिसून येत आहे.