‘जास्त जागा येऊनही सत्ताधाऱ्यांना दिवाळी गोड गेलेली नाही. उलट आघाडीच्या ४४-५४ जागा येऊनही आम्ही आनंदी आहोत’, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधीमंडळ नेतेपदी अजित पवार यांची निवड झाली आहे. विधीमंडळ नेता निवडीबाबत राष्ट्रवादीची बुधवारी मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत राष्ट्रवादीचे सर्व आमदार उपस्थित होते. या बैठकीत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला जवळपास सर्वांनीच अनुमोदन दिले. विधीमंडळ नेतेपदी वर्णी लागल्यानंतर अजित पवार बैठकीत बोलत होते. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. राज्यात सध्या अतिवृष्टीमुळे शेतकर्यांचे नुकसान झालेले आहे. राज्यात सत्ता स्थापन होण्याआधी या शेतकर्यांना मदत करण्याची गरज आहे. त्यामुळे अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ, सुनील तटकरे हे उद्या राज्यपालांची भेट घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
हेही वाचा – राष्ट्रवादीच्या विधीमंडळ नेतेपदी अजित पवार यांची निवड
नेमके काय म्हणाले अजित पवार?
‘जास्त जागा येऊनही सत्ताधाऱ्यांची दिवाळी गोड गेलेली नाही. उलट आघाडीच्या ४४-५४ जागा येऊनही आम्ही आनंदी आहोत. मी १ लाख ६५ हजारांच्या मताधिक्याने निवडून आलो, हा विश्वास बसत नाही. मावळची जागा १९९९ पासून आम्हाला निवडून आणता आली नव्हती. मात्र सुनील शेळकेने ९५ हजार मताधिक्याने राज्यमंत्र्याचा पराभव केला. आर. आर. आबा आज असते तर आमचं सरकारच आलं असतं’, असे अजित पवार म्हणाले. त्याचबरोबर ‘मला दिलेली महत्त्वाची जबाबदारी कशी उत्तमरित्या पार पाडता येईल, याचा प्रयत्न मी मनापासून करेल. राष्ट्रवादीचे काम विधानसभेत कसे उजवे ठरेल, याचा प्रयत्न करेल’, असेही ते म्हणाले.
हेही वाचा – शिवसेनेची संख्याबाळ आता ६२वर, सहा अपक्ष आमदारांचा पाठिंबा
अजित पवार राज्यपालांची भेट घेणार
‘आघाडीची संख्या ११५ पर्यंत जात आहे. अपक्षांना त्यांच्या मतदारसंघात काम करायचे असल्यामुळे ते सत्ताधारी पक्षाकडे झुकतात. सत्तेच्या प्रलोभनामुळे आपले जिवाभावाचे सहकारी सोडून गेले. मी आधीपासून सांगत होतो, अंडरकरंट आहे. लोकभावना सरकारच्या विरोधात होती. जयंत पाटील, छगन भुजबळ यांच्यासोबत उद्या राज्यपालांची भेट घेणार आहोत. राज्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले आहे. त्यावर लवकर उपाययोजना करण्यास सांगणार आहोत’, असे अजित पवार म्हणाले.