कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने घट होत असल्याने राज्य सरकारने कोरोना निर्बंध आणखी सैल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, दुकानाची वेळ वाढवण्यात आली आहे. राज्यातील सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट्स रात्री १२ वाजेपर्यंत खुली ठेवता येणार आहेत. तर सर्व प्रकारची दुकाने रात्री ११ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. यासंदर्भातील कार्यपद्धती आणि नियमावली जाहीर करण्यात आली आहे.
राज्य आता हळूहळू अनलॉकच्या दिशेने जात आहे. राज्यात याआधी हॉटेल्स,रेस्टॉरंट्स १० वाजेपर्यंत चालू ठेवण्यास परवानगी होती. आता टास्क फोर्स सोबत झालेल्या बैठकीनंतर हॉटेल्स, रेस्टॉरंट्स १२ वाजेपर्यंत चालू ठेवण्यास परवानगी दिली आहे. तसंच, सर्व प्रकारची दुकाने रात्री ११ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय, अम्युझमेंट पार्क देखील २२ ऑक्टोबरपासून खुली होणार आहेत. यासाठीच्या मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. हॉटेल्स, रेस्टॉरंट्समधील कर्मचारी तसंच ग्राहकांचं लसीकरण आवश्यक आहे. फेस मास्क तसंच, सॅनिटायझरचा वापरही अनिवार्य आहे.
२२ ऑक्टोबरपासून अम्युझमेंट पार्क खुली होणार
२२ ऑक्टोबरपासून अम्युझमेंट पार्क खुली होणार आहेत. अम्युझमेंट पार्कमधील मोकळ्या जागेत कोरड्या राईड्ससाठी परवानगी देण्याचे ठरले असून पार्क्समधील पाण्यातल्या राईड्सबाबतीत नंतर निर्णय घेण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी वर्षा येथे कोरोना कृती दलाच्या सदस्यांची बैठक पार पडली. या बैठकीत दिवाळीच्या तोंडावर कोरोना निर्बंध आणखी शिथिल करून जनतेला दिलासा देण्याचा निर्णय घेण्यात आला.