मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आरोप-प्रत्यारोपांची राजकीय धुळवड सुरू झाली आहे. त्याचबरोबर विविध उद्घाटन, लोकार्पण कार्यक्रमांचा धडाकाही पाहायला मिळत आहे. अशाच एका उद्घाटन सोहळ्यावरून ठाकरे गटाने शिंदे गटाला लक्ष्य केले आहे. ‘अरेरे! काय दिवस आले?’ असे सांगत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिंदे गटाला टोला लगावला आहे.
हेही वाचा – Politics: स्वत:ला स्वाभिमानी म्हणवणारे आता दिल्लीत…; राऊतांचा शिंदेंसह अजितदादांवर घणाघात
देशात लोकसभा निवडणुकीचा ज्वर चढण्यास सुरुवात झाली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना तसेच भाजपाला लक्ष्य करण्यात येत आहे. मुंबईतील घाटकोपर येथे शिवसेनेच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले. विशेष म्हणजे, नियोजित कार्यक्रमानुसार या शाखेचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार होते. पण ऐनवेळी मुख्यमंत्री शिंदे यांचा सातारा दौरा ठरल्याने ते या शाखेच्या उद्घाटनाला येऊ शकले नाहीत. त्यामुळे भाजपा नेते आणि मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात आले. घाटकोपर पूर्व येथे डीप क्लीन ड्राइव्हासाठी मंगलप्रभात लोढा आले होते.
अरेरे! काय दिवस आले? घाटकोपरमध्ये मिंधे गटाच्या शाखेचे लोकार्पण #भाजपा मंत्र्याच्या हस्ते करावे? अजून काय पुरावा हवा आहे की ही यांचा आता निव्वळ ‘कचरा’ झाला आहे! यांना स्वगटातील एक बरा माणूस सापडू नये उदघाटन करण्यासाठी? लवकरच या शाखेची पाटी बदलून तिथे कमळाचे ठिगळ लावावे लागणार…
— Ambadas Danve (@iambadasdanve) March 9, 2024
यावरून ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी ट्वीट करत शिंदे गटावर निशाणा साधला आहे. अरेरे! काय दिवस आले? घाटकोपरमध्ये ‘मिंधे’ गटाच्या शाखेचे लोकार्पण भाजपा मंत्र्याने करावे? यांना स्वगटातील एक बरा माणूस सापडू नये उद्घाटन करण्यासाठी? अजून काय पुरावा हवा आहे की यांचा आता निव्वळ ‘कचरा’ झाला आहे! लवकरच या शाखेची पाटी बदलून तिथे कमळाचे ठिगळ लावावे लागणार आहे हे नक्की, असा टोला त्यांनी लगावला आहे.
हेही वाचा – Lok Sabha 2024 : रात्री उशिरापर्यंत खलबते करूनही खऱ्या शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या पदरी निराशाच!