माऊली आणि तुकोबाचे विचार सर्व जगाला माहिती आहे. आपण त्यांच्या विचारांसमोर नतमस्तक होतो. पण कोण तरी संभाजी भिडे येतो आणि माऊली-तुकोबांपेक्षा मनू श्रेष्ठ होता असे बेताल वक्तव्य करतो हे पुरोगामी महाराष्ट्रासाठी चुकीचे असून महाराष्ट्रातील जनता कदापी खपवून घेणार नाही. यामागचा मास्टरमाईंड कोण आहे? हे स्पष्ट करावे आणि तरुणांचे विचार भ्रष्ट करण्याचे काम करणाऱ्या संभाजी भिडे यांना तात्काळ अटक करा, अशी मागणी विधीमंडळ पक्षनेते अजितदादांनी औचित्याच्या मुद्दयाद्वारे सभागृहात केली.
५७ टक्के लोकांना शुद्र मानणारा मनू श्रेष्ठ कसा ? हे आपल्या राज्यात चालणार नाही. यावर राज्य सरकारची भूमिका स्पष्ट व्हायला हवी. मागच्या वर्षी हे पालखीमध्ये तलवारी घेवून आले होते. यांचा पाठीराखा कोण आहे? असा सवालही दादांनी केला.
संभाजी भिडे सतत करत असलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर संताप व्यक्त करत अजित पवार म्हणाले की, त्या व्यक्तीला काय बोलावे कसे बोलावे? हे कळत नाही. एकीकडे ते सांगतात माझ्या बागेतले आंबे खा म्हणजे मुले होतील आणि काल तर कहरच केला. संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वरमाऊली महाराज यांच्यापेक्षा मनु हा श्रेष्ठ होता या पध्दतीचे वक्तव्य चुकीचे आहे.
भिडे यांच्या वक्तव्यावर सभागृहात बोलताना अजित पवार
मनोहर भिडे यांनी संत तुकाराम महाराज व ज्ञानेश्वर महाराजांपेक्षा मनु श्रेष्ठ असल्याच्या केलेल्या वक्तव्याचा विधिमंडळ पक्षनेते Ajit Pawar यांनी सभागृहात निषेध व्यक्त केला. सरकारने यावर आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.#MonsoonSession #नागपूर_अधिवेशन
Posted by Nationalist Congress Party – NCP on Monday, 9 July 2018
मनुने सर्वांना अतिशय तुच्छ लेखले होते. समाजातील दोन-तीन टक्केच लोक चांगली आहेत, असे विचार मनुने सांगितले. मनुचा विचार खोडून काढण्याचे काम महात्मा फुलेंनी केले, संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी यांनी तर मनुस्मृती जाळून टाकली. त्या मनुला भिडे मंडळी गोंजारत आहेत? पुरोगामी महाराष्ट्रात हे कसले विचार आणले जात आहेत? असा सवाल करत भिडे यांना अटक करण्याची मागणी त्यांनी मांडली.