मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेत घेतल्याने मेलेले जिवंत झालेत, असं वादग्रस्त वक्तव्य शिवसेनेचे समर्थक आमदार आशिष जैस्वाल यांनी केलं. जैस्वाल यांच्या वक्तव्यामुळे आघाडीत जुंपण्याची शक्यता आहे. नागपूरमध्ये जिल्हा परिषद पोटनिवडणुकीच्या प्रचारावेळी जैस्वाल यांनी हे वक्तव्य केलं आहे. यानंतर आता काँग्रेस-राष्ट्रवादी काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
आशिष जैस्वाल काय म्हणाले?
“हे काँग्रेसचे लोकं…अरे मेले होते तुम्ही. तुम्हाला कुणी विचारत नव्हतं…त्या उद्धवजी ठाकरेंनी तुम्हाला सरकारमध्ये घेतलं…म्हणून हे मेलेले लोकं जिवंत झाले. नाहीतर यांच्या दोन्ही पार्टीमध्ये गळती लागली होती की कुत्र विचारायला तयार नव्हतं. सर्व सुटकेस बांधून दुसऱ्या पक्षात जायला तयार होते. हे सर्व मेलेले लोकं जिवंत झाले आहेत. ओपनली सांगतोय, फेसबूकवर सांगतोय,” असं जैस्वाल म्हणाले.
सुहास कांदे छगन भुजबळ यांच्या विरोधात हायकोर्टात
शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी थेट राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात हायकोर्टात धाव घेतली आहे. नियोजन समितीचा निधी भुजबळांनी विकल्याचा आरोप आमदार सुहास कांदे यांनी केला आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी कांदेंनी थेट कोर्टातच धाव घेतली. याचिकेत जिल्हाधिकारी आणि जिल्हा नियोजन अधिकारी यांना देखील प्रतिवादी करण्यात आलं आहे. भुजबळांनी निधी विकल्याचे पाचशे पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा सुहास कांदे यांनी केला आहे.