बंगालच्या उपसागरातील हवेच्या कमी दाब्याच्या क्षेत्रामुळे निर्माण झालेलं गुलाब चक्रीवादळ परवा रात्री उशीरा दक्षिण ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीला येऊन धडकलं आणि याचा परिणाम म्हणून पुढील दोन ते तीन दिवस राज्यात वेगवान वाऱ्यांच्या साथीने जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागानुसार, विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर कोकणातील जिल्ह्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई वेधशाळा आयएमडीने दिेलेल्या माहितीनुसार, पुढील ३-४ तासात मुंबईसह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. यामध्ये धुळे, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, नाशिक, अहमदनगर, पुणे आणि सातारा जिल्ह्यांत काही ठिकाणी मध्यम ते तीव्र पावसाची शक्यता आहे. काही भागात वादळी वाऱ्यासह मेघगर्जने/विजांची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.
येत्या काही तासात पावसाचा जोर वाढणार असल्याने नांदेड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर काही भागात वादळी वाऱ्यासह मेघगर्जने/विजांची अंदाज वर्तवण्यात आला आहे. अशा परिस्थितीत घराबाहेर जाताना खबरदारी घेण्याचे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आलं आहे. यासह औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली आणि जळगाव जिल्ह्यांत वेगळ्या ठिकाणी ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.
गुलाब चक्रीवादळामुळे राज्यात पावसाचा जोर वाढत आहे. आज कोकण आणि मध्य महाराष्ट्रात वादळी पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर मराठवाडा, पश्चिम विदर्भातही तुरळक ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी मध्य महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव येथे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबई, सिंधुदुर्ग, नंदुरबार, नगर, पुणे येथे ऑरेंज अलर्ट आणि सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, बुलडाणा, अमरावती, वाशीम येथे येलो अलर्ट जारी करण्यात आल्याची माहिती आहे.