विरोधी पक्षाचे काम चोख करा, महाविकास आघाडीला सल्ले देऊ नका असा पलटवार शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर केला आहे. महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सक्षम असल्याचे संजय राऊत म्हणाले आहेत. तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपालाही राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे. महाराष्ट्रातील काम करत असू तर ते केंद्राकडूनच शिकलो आहोत असा खोचक टोला राऊतांनी देवेंद्र फडणीसांना लगावला आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना भाजपवर घणाघात केला आहे. चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या टीकेला राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे की, तुमच्या सल्ल्याची गरज नाही आणि तुमच्या सल्ल्यावर राज्य चालत नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सक्षम आहेत. महाराष्ट्रातील संपूर्ण मंत्रिमंडळ व्यवस्थित काम करत असल्याचे चंद्रकांत पाटील यांना माहिती आहे. सल्ले कसले देताय विरोधी पक्षाने चोख काम करा असे संजय राऊत म्हणाले आहेत.
फडणवीसांनी राज्य सरकारच्या कामाचे स्वागत केलं पाहिजे
अधिवेशनात नियमबाह्य पद्धतीने सरकार काम करत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. यावर संजय राऊत म्हणाले की, विधानसभा अध्यक्षांसाठी नियम बदलले जात आहेत. फडणवीसांना नियमबाह्य वाटत असेल तर केंद्राकडून आम्ही शिकलो आहे. त्यांनी समजून घ्यावे केंद्राच्या पावलावर पाऊल टाकत आम्ही काही करत असू तर त्यांनी त्याचे स्वागत केले पाहिजे. केंद्र सरकार कसे वागत आहे ते अख्खा देश पाहत असल्याचे संजय राऊतांनी सांगितले.
२०२४ मध्ये उलटी गंगा वाहणार
भाजपच्या कार्यालयातून ईडीची सूत्रे हालत असतील तर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस असेल किंवा आमचे निकटवर्तीय असतील त्यांना त्रास होणार आहे. जया बच्चन यांच्या सुनबाईंवर कारवाई झाली. जे जे सरकारला प्रश्न विचारतील त्यांना केंद्रीय तपास यंत्रणांसमोर उभे केले जाईल आणि त्यांच्या कुटुंबीयांना त्रास देणं सुरुच राहणार आहे. परंतु हे २०२४ पर्यंत चालणार आहे यानंतर उलटी गंगा वाहणार असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.
गृहराज्यमंत्र्यांचा राजीनामा घेणार
दिल्लीत संसदेच्या परिसरात महात्मा गांधी पुतळ्यापासून विजय चौकापर्यंत मार्च काढला त्यामध्ये प्रमुख नेते उपस्थित होते. काही झाले तरी आम्ही संबंधित व्यक्तीला तुरुंगात पाठवल्याशिवाय राहणार नाही. उत्तर प्रदेशमध्ये सत्ता बदल होण्याची शक्यता आहे. यानंतर २०२४ मध्ये सुद्धा देशात सत्तापरिवर्तन होण्याची शक्यता आहे. शेवटी जनआंदोलन महत्त्वाचे आहे. शेतकऱ्यांच्या मागणीसमोर केंद्र सरकारला मागे हटावे लागले त्यानुसारच गृहराज्यमंत्री टेनी यांचा राजीनामा घ्यावा लागेल.
हेही वाचा : सरकारवर अविश्वास ठराव आणून दाखवा!