महाविकास आघडीमागे १७१ आमदारांचे पाठबळ असताना काही जण सरकार स्थापन झाल्यापासून ते पडावे म्हणून देव पाण्यात बुडवून बसले आहेत. आघाडीचे सरकार दमदारपणे काम करत आहे. त्यामुळे कुणी सरकार पाडण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांना यश येणार नाही, असा टोला शिवसेना विधिमंडळ पक्षाचे नेते तसेच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी विरोधी पक्ष भाजपला टोला लगावला.
सरकारने नुकतेच एक वर्ष पूर्ण केले आहे. या काळात सरकारने शेतकरी, सर्वसामान्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले. त्यामुळे जनतासुद्धा सरकारच्या सोबत असल्यामुळे सरकार पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना फायदा होणार नाही, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. सत्ताधारी पक्षातील आमदार आणि नेत्यांना राजकीय सुडापोटी ईडीच्या नोटीसा पाठविल्या जात आहेत. पण लोकशाहीत निवडणुका होत असतात. कुणी जिंकत असते तर कुणी पराभूत होत असते हे लक्षात ठेवावे, असे शिंदे यांनी बजावले.
दरम्यान, आपण महत्वाच्या वास्तूंना राज्यातील मोठ्या व्यक्तींची नाव देतो. त्यामुळे आम्हा सगळ्यांची एक अपेक्षा आहे की, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दिले पाहिजे. हे नाव दिल्यामुळे त्या वास्तूला एक महत्त्व प्राप्त होईल. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नुकतेच पत्र दिल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.
हेही वाचा – राज्यात ३,०१८ नवे रुग्ण, ६८ जणांचा मृत्यू