भारतात अनेक समाजसेवकांनी समाजाप्रती मोठे योगदान दिले आहे. यातील मुख्य नाव म्हणजे बाबा आमटे यांचे आहे. आजन्म समाजसेवेच्या व्रताचे पालन केलेल्या बाबा आमटे यांना आधुनिक भारताचे संत म्हटले जाते. या महान व्यक्तिमत्त्वाची आज 9 फेब्रुवारीला पुण्यतिथी आहे. कुष्ठरोग्यांना तिमिरातून तेजाकडे नेणारे बाबा आमटे यांना त्यांच्या कार्यशैलीमुळे आणि जीवनाचे तत्वज्ञान आणि सेवेमुळे आधुनिक काळातील गांधी असे संबोधले जाते. त्यांनी कुष्ठरुग्णांसाठी अनेक निवारे आणि समुदाय स्थापन केले. याशिवाय वन्यजीव संवर्धन, नर्मदा बचाव आंदोलन यांसह अनेक सामाजिक कार्यात आपला सहभाग नोंदवला. नर्मदा बचाव आंदोलनात त्यांनी जवळपास १२ वर्षे म्हणजेच एक तप नर्मदेकाठी मुक्काम करत आंदोलनाला पाठिंबा दिला.त्यांच्या समाजकार्याची दखल घेत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने रॅमन मॅगसेसे पुरस्कार, पद्मश्री आणि पद्मविभूषण पुरस्कारांचा समावेश आहे. ९ फेब्रुवारी २००८ रोजी वरोडा येथील निवासस्थानी रक्ताच्या कर्करोगाने त्यांचे निधन झाले.
आनंदवनातुन कुष्ठ रुग्णांच्या जीवनामध्ये आनंद फुलवणारे, थोर समाजसुधारक ‘पद्मविभूषण’ बाबा आमटे यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!#बाबा_आमटे pic.twitter.com/lG7aSW1hkQ
— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) February 9, 2022
बाबा आमटे यांनी आजन्म कुष्ठरोग रुग्णांची सेवा
बाबा आमटे यांनी आजन्म कुष्ठरोग रुग्णांची सेवा केली. समाजाने नाकारलेल्या कुष्ठरोगग्रस्तांना आधार देण्याबरोबरच त्यांना स्वावलंबी बनवण्याचे महान कार्य त्यांनी केले. यासाठी त्यांनी १९५२ साली वरोड्याजवळ आनंदवनाची स्थापना केली. २००८ पर्यंत हे आश्रम जवळपास ३८०० कुष्ठरोग्यांचे घर बनले आहे. आज आनंदवनात सर्व जाती-धर्माचे, सर्व थरांतील लोक आहेत. कुष्ठरोग्यांप्रमाणेच अंध, मूक-बधिरांसाठी विशेष शाळा देखील आनंदवनात आहेत.
आदिवासींना शेतीच्या नवीन पद्धती शिकवल्या
भामरागड तालुक्यातील आदिवासींच्या विकासासाठी त्यांनी हेमलकसा येथे लोकबिरादरी प्रकल्प सुरू केला. या प्रकल्पांतर्गत आदिवासींना शेतीच्या नवीन पद्धती शिकवल्या जातात. बाबा आमटे यांनी समाजातील दुःखी, कष्टी, दीनदुबळ्यांची, समाजाने नाकारलेल्यांची सेवा केली. बाबा आमटे यांच्या या कार्याला त्यांच्या पत्नी साधना आमटे यांची साथ लाभली. समाजसेवक बाबा आमटे हे प्रतिभावान साहित्यिकसुद्धा होते. त्यांनी ज्वाला आणि फुले आणि उज्ज्वल उद्यासाठी हे काव्यसंग्रह लिहिले.
गांधीजींच्या विचारांनी ते प्रभावित झाले
२६ डिसेंबर १९१४ रोजी महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे त्यांचा जन्म झाला. मुरलीधर देवीदास हे त्यांचे मूळ नाव. त्यांचे कुटुंब जमीनदार होते. वरोड्यापासून पाच-एक मैलांवरील गोरजे गावाची जमीनदारी आमटे घराण्याकडे होती. त्यामुळे त्यांचे बालपण सुखात गेले. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण नागपूरमध्ये पार पडले. नागपूर विद्यापीठातून १९३४ मध्ये ते बी.ए. आणि १९३६ मध्ये एल.एल.बी. ह्या पदव्या मिळवल्या. डॉक्टर बनण्याचे स्वप्न असलेल्या बाबा आमटे यांनी वडिलांच्या आग्रहाखातर वकील झाले. त्यानंतर त्यांनी काही काळ वकिलीसुद्धा केली.सेवाग्राम आश्रमात राहत असताना गांधीजींच्या विचारांनी ते प्रभावित झाले.
हे ही वाचा – BJP SP manifesto UP election : शेतकऱ्यांना मोफत वीज, वर्षाला २ सिलेंडर मोफत, भाजप अन् सपाकडून ९ सारखीच आश्वासनं