घरमहाराष्ट्रबाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग

बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग

Subscribe

राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात येणार आहे. बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज्याचे कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांना दिली. मुंबई-पुणे प्रवास दोन तासांवर आणण्याचे बाळासाहेबांनी पाहिलेले स्वप्न सन १९९५मध्ये राज्यात युतीची सत्ता आल्यानंतर पूर्ण झाले. मुंबई-पुणे या देशातील पहिल्यावहिल्या द्रुतगती महामार्गाची मुहूर्तमेढ बाळासाहेबांनी रोवली होती. यात तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांचा सिंहाचा वाटा होता.

देशातील पहिल्या द्रुतगती महामार्गाचे शिल्पकार असलेले बाळासाहेब ठाकरे यांच्या दूरदृष्टीचा यथोचित सन्मान व्हावा अशी शिवसेनेच्या खासदार-आमदारांची भावना होती. आजच्या निर्णयामुळे त्या भावनेचा सन्मान झाला आहे, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. हा महामार्ग लवकरच पूर्ण होईल, असेही ते म्हणाले. तुलनेने मागास असलेल्या विदर्भ-मराठवाड्याच्या अर्थकारणाला गती देणारा प्रकल्प म्हणून या महामार्गाकडे पाहिले जाते. भूसंपादनाच्या वादामुळे सुरुवातीला शिवसेनेने या प्रकल्पाला विरोध केला होता. मात्र, त्यानंतर शिवसेनेने विरोधाची भूमिका बदलली होती.

- Advertisement -

समृद्धी महामार्गाला माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याचे भाजपने ठरवले होते. मात्र, या महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी शिवसेनेने केली होती. तसे पत्रही तत्कालिन सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले होते. त्यामुळे महामार्गाच्या नाव देणे निश्चित होऊ शकले नव्हते. मात्र आता शिवसेनेची सत्ता असल्यामुळे आणि त्यांचाच मुख्यमंत्री असल्याने समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरेंचे नाव द्यायचे निश्चित करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -