घरमहाराष्ट्रबारवी पुनर्वसन अंतिम टप्प्यातच; यंदा अतिरिक्त पाणीसाठा होणार

बारवी पुनर्वसन अंतिम टप्प्यातच; यंदा अतिरिक्त पाणीसाठा होणार

Subscribe

तोंडली आणि काचकोली येथील रहिवाशांचे तोंडली-१, तोंडली-२ आणि कोचकोली-१ आणि कोचकोली-२ अशा प्रत्येकी दोन ठिकाणी पुनर्वसन करण्यात आले आहे

प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसन प्रश्नावरून जवळपास १० वर्षे रेंगाळलेला बारवी विस्तारीकरण प्रकल्प आता मार्गी लागला आहे. येत्या पावसाळ्यात धरणात सुमारे १०० दशलक्ष घनमीटर अधिक पाणीसाठा होणार आहे. मुरबाड तालुक्यातील तोंडली, काचकोली, कोळे-वडखळ आणि मोहघर येथील १२०४ कुटुंबांच्या पुनर्वसन प्रश्नावरून धरणाची उंची सहा मीटरने वाढूनही अतिरिक्त पाणीसाठा करता येत नव्हता. मात्र गेल्या वर्षभरात बहुतेक प्रकल्पबाधितांना त्यांच्या घरांचे मूल्यांकन, पर्यायी जागा देण्यात आल्या असून शेकडो कुटुंबे त्यांना दिलेल्या जागेत स्थलांतरीत झाली आहेत.

अखेर पाण्याचा प्रश्न सुटणार

ठाणे जिल्ह्यातील शहरांना पाणी पुरवठ्यासाठी सध्या एमआयडीसीचे बारवी धरण आणि उल्हास नदी हे दोनच पर्याय आहेत. टाटा कंपनीच्या भिवपुरी येथील जलविद्युत प्रकल्पासाठी वापरले जाणारे आंदर धरणातील पाणी नंतर उल्हास नदीत सोडले जाते. तेच पाणी नंतर ठाणेकरांना पुरवले जाते. ठाणे जिल्ह्यातील शहरांची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यांना पुरेसा पाणी पुरवठा होण्यासाठी प्रस्तावित करण्यात आलेली काळू आणि शाई हे धरण प्रकल्प अद्याप मार्गी लागू शकले नाहीत. त्यामुळे सध्या तरी ठाण्यातील शहरांना वाढीव पाणी पुरवठ्यासाठी बारवी विस्तारीकरण हाच पर्याय आहे. दिवसेंदिवस पाण्याची गरज आणि पुरवठा यात येणारी तूट वाढू लागली आहे. यंदा तर १५ जुलैपर्यंत पाण्याचे नियोजन करण्यासाठी ३० टक्के पाणी कपात करावी लागली होती.

- Advertisement -

असे केले प्रयत्न

ठाणे जिल्ह्याच्या पाणी पुरवठ्याचा गंभीर प्रश्न लक्षात घेता गेल्या वर्षभरात युद्ध पातळीवर कामे करण्यात आली. एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी प्रकल्पग्रस्तांच्या थेट घरोघरी जात त्यांच्याशी संवाद साधला. पुनर्वसन भरपाईविषयी त्यांच्या मनात असलेल्या शंकांचे त्यांनी निरसन केले. स्थानिक आमदार किसन कथोरे यांनी त्यासाठी गावकऱ्यांसोबत अनेक बैठका घेतल्या. गावात जाऊन लोकांना धनादेश दिले. पर्यायी जागांवर गावठाण विकसीत करून दिले. शाळा, समाजमंदिर, प्राथमिक आरोग्य केंद्र, अंगणवाडी, ग्रामपंचायत कार्यालय, रस्ते बांधले.

असे झाले पुनर्वसन

तोंडली आणि काचकोली येथील रहिवाशांचे तोंडली-१, तोंडली-२ आणि कोचकोली-१ आणि कोचकोली-२ अशा प्रत्येकी दोन ठिकाणी पुनर्वसन करण्यात आले आहे. पाच सदस्य असलेल्या कुटुंबाला ३७० चौरस मीटरचा भूखंड किंवा ६ लाख ६५ हजार रूपये देण्यात आले. पाचपेक्षा अधिक कुटुंबसंख्या असलेल्या कुटुंबांना ७४० चौरस मीटरचा भूखंड किंवा १३ लाख ३० हजार रूपये देण्यात आले. तोंडली, काचकोली येथील शेकडो कुटुंबांनी पुनर्वसन पॅकेज स्वीकारले असून ते पर्यायी जागेत स्थलांतरीतही झाले आहेत. काही घरांची कामे सध्या सुरू असून ते जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत नव्या घरात रहायला जातील. तोंडली १ आणि २ ही गावठाणे मुरबाड-म्हसा रस्त्याच्या दुतर्फा स्थलांतरीत झाली आहेत. काचकोलीवासियांना मोहघरच्या दिशेला जागा देण्यात आल्या आहेत. तिथे त्यांनी टुमदार घरे बांधली आहेत.

- Advertisement -

काही कुटुंबांचे पुनर्वसन बाकी

कोळे-वडखळ गावाला पुनर्वसनासाठी दिलेली जागा वन विभागाची असल्याने तेथील शंभर कुटुंबांचा प्रश्नसुध्दा प्रलंबीत आहे. त्याचप्रमाणे तोंडली गावातील काही कुटुंबांच्या घरांचे फेरमूल्यांकन केले जात आहे. तोंडलीत अजूनही २८६ कुटुंबे विस्तारीत धरण प्रकल्पाच्या कक्षेत आहेत. त्यापैकी ९९ कुटुंबांनी पुनर्वसन पॅकेज स्वीकारले आहे. ते लवकरच स्थलांतरीत होतील. उर्वरित १८७ जणांना तोंडली-१ आणि तोंडली-२ मध्ये भूखंड देण्यात आले आहेत. मात्र तरीही खबरदारीचा उपाय म्हणून या कुटुंबांना जून महिन्यात दरमहा सहा हजार या हिशोबाने आठ महिन्यांचे ४८ हजार रूपये घरभाडे आणि ५४ हजार रूपये खावटी देण्यात येईल, माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.

अतिरिक्त जलसाठा

सध्या धरणात २३४ दशलक्ष घन मीटर पाणीसाठा होतो. विस्तारीकरणानंतर ३४०.४८ दशलक्ष घन मीटर पाणीसाठा होणार आहे. सध्या ठाणे जिल्ह्यातील शहरांना पाणी पुरवठा करताना संबंधित प्राधिकरणांना बरीच कसरत करावी लागते. त्यामुळे अतिरिक्त पाणीसाठ्यामुळे जिल्ह्यातील शहरवासियांना दिलासा मिळणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -