राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आज मुंबईत भाजपचे जोरदार आंदोलन सुरु आहे. महाविकास आघाडी सरकारने मलिकांचा त्वरित राजीनामा घेण्याच्या मागणीसाठी मुंबईच्या आझाद मैदानातून या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. या आंदोलनात भाजप नेते देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, नितेश राणे यांच्यासह अनेक प्रमुख नेते सहभागी झालेत. यावेळी शेकडो आंदोलकांच्या उपस्थित मलिकांच्या राजीनाम्याशिवाय भाजप गप्प बसणार नाही अशी घोषणा दिल्या जात आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपचं हे आंदोलन सुरु आहे. आझाद मैदान ते मेट्रो सिनेमापर्यंत या मोर्चाला सुरुवात झाली आहे. या मोर्चाला संबोधित करताना भाजप आमदार नितेश राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. “महाविकास आघाडीचे मंत्री, घरातून न निघालेले मुख्यमंत्री, महाविकास आघाडी सरकारवर नागासारखे बसून असलेल्या शरद पवारांना हा संदेश मिळालाच पाहिजे” असं विधान नितेश राणे यांनी केलं आहे.
यावेळी नितेश राणे म्हणाले की, “मुंबईकडे वाकड्या नजरेने पाहाल तर भाजप कार्यकर्ता तुम्हाला महाराष्ट्रात फिरकू देणार नाही. राजीनामा का मागतोय? अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसोबत नवाब मलिकांनी व्यवहार केल्यामुळे हा राजीनामा मागतोय.”
अनिल देशमुख हिंदू मराठा म्हणून त्यांच्यावर अन्याय? नितेश राणेंचा सवाल
“माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा शरद पवार यांनी लगेच घेतला. मग नवाब मलिक यांना तो न्याय का नाही? अनिल देशमुख हे हिंदु मराठा आहेत म्हणून त्यांच्यावर अन्याय केला का?” असा गंभीर सवाल आमदार नितेश राणे यांनी उपस्थित केला. काल मुंबईत आयोजित एका कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात नितेश राणे बोलत होते. यावेळी देखील त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर गंभीर टीकास्त्र डागले.
यावेळी नितेश राणे म्हणाले की, “अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्ट्राचाराचे आरोप झाले. परंतु त्यापेक्षा गंभीर आरोप नवाब मलिकांवर झालेत. मग मलिकांचा राजीनामा शरद पवार का घेत नाही?” असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
…तर मलिकांच्या कानाखाली वाजवली असती
“पोलीस प्रशासन हतबल आहे. दाऊदसोबत फिरणाऱ्यांना पोलिसांना सलाम करावा लागतोय. ईडीने अटक केल्यानंतर मलिक कसे हातवारे करत होते. पोलिसांना थोडं बाजूला ठेवलं असतं तर मलिकांच्या कानाखाली वाजवली असती,” अस गंभीर विधान नितेश राणे यांनी यावेळी केले.