अंडरवर्ल्डशी संबंध आणि मनी लॉंड्रिंग प्रकरणात अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना अटक केली असून त्यांच्या अटकेनंतर विरोधी पक्ष असलेला भाजपाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. नवाब मलिकांच्या राजीनाम्याची मागणी भाजपाने लावून धरली आहे. तरीही ठाकरे सरकारने मलिकांचा राजीनाम न घेण्याचे ठरवले आहे. अशात आज मलिकांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपाने मुंबईत विराट मोर्चा काढला आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदान ते मेट्रो सिनेमापर्यंत भाजपाच्या मोर्चाला सुरुवात झाली आहे. त्यापूर्वी आझाद मैदानावर बोलत असताना भाजप नेते अॅड. आशिष शेलार म्हणाले की, ‘इंद्राचे आसान वाचवू शकले नाही, तर मुख्यमंत्री तुमचे आसन काय वाचणार?’ असा थेट इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला आहे.
नक्की आशिष शेलार काय म्हणाले?
आशिष शेलार म्हणाले की, ‘खरंतर काही मागण्यासाठी केलेला हा मोर्चा नसून हा जनआक्रोश मोर्चा आहे. मुंबईकरांसह महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील आक्रोश व्यक्त करणारा हा मोर्चा आहे. रखरखत्या उन्हात आज लोकं आझाद मैदानावर आले आहेत. कोरोनाच्या काळानंतर सगळ्यात यशस्वी आणि मोठा मोर्चा म्हणून भाजपच्या या विरोट मोर्चाची इतिहासात नोंद होईल. 1993 बॉम्बस्फोटाच्या ज्या जखमा आमच्यावर झाल्या त्या अजूनही ताज्या आहेत. मुंबई आणि राज्यावर केलेला हल्ला आम्ही विसरू शकलो नाही. या सगळ्याचा मास्टर माइंट हा दाऊद इब्राहिम आहे आणि होता.’
‘1993च्या बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेननला फाशी देऊ नका, अशी मागणी उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळातील एका लुच्छाने केली होती. त्याच अस्लम शेख बरोबर तुम्ही आज मांडीला मांडी लावू बसतात. तसेच ज्या नवाब मलिकांनी आरोपी असलेल्या सलीम पटेल, सलीम फ्रूट, सरदार शावली खान, हसीना पारकर या सगळ्यांसोबत आर्थिक व्यवहार केला. या सगळ्यांसोबत मंत्रिमंडळात बसलात, कुठे फेडला ही पाप. काही जण म्हणतात, महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकणार नाही. अरे तुम्ही म्हणजे महाराष्ट्र आहात का? देवेंद्र फडणवीसांनी सांगितले ते खरे आहे, साडे तीन जिल्हे म्हणजे महाराष्ट्र होत नाही. तुमचे मत असेल महाराष्ट्र कराची समोर झुकवा तर महाराष्ट्र कदापी दाऊदच्या कराची समोर झुकणार नाही. म्हणून जास्त बोलायची वेळ नाही, या झोपी गेलेल्या सरकारला जागे करायचे आहे. बॉम्बस्फोटातील आरोपीशी व्यवहार करणाऱ्याला या नवाब मलिकांचा राजीमाना घ्यायचा आहे. त्यांना संरक्षण देणाऱ्या शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना इशारा द्यायचा आहे. इतिहासात अशी गोष्ट आहे, ज्यावेळेला तक्षक नावाच्या सर्पाला संरक्षण देण्याचे काम इंद्राने केले त्यावेळेला इंद्राय स्वाहा, तक्षकाय स्वहा. म्हणून इंद्राचे आसान सुद्धा वाचवू शकले नाही. तर उद्धव ठाकरे तुमचे आसन काय वाचणार आहे,’ असे आशिष शेलार म्हणाले.