घरताज्या घडामोडीमहाराजांच्या इतिहासाचे हिरवेकरण करण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न, चंद्रकांत पाटलांचा आरोप

महाराजांच्या इतिहासाचे हिरवेकरण करण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न, चंद्रकांत पाटलांचा आरोप

Subscribe

ऐतिहासिक बाबींचे सरसकट कागदोपत्री पुरावे मिळू शकत नाहीत, याचा फायदा घेऊन महाविकास आघाडी सरकारच्या आशीर्वादाने आणि पोलिसांच्या मदतीने गडकिल्ल्यांचे पावित्र्य नष्ट करण्यात येत आहे, अशी टीका पाटील यांनी केली.

राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या आघाडीचे सरकार आल्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे हिरवेकरण करण्याचा निंदनीय प्रयत्न सुरू असल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी येथे केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांवर विशिष्ट धर्माची स्थाने उभारण्याचे प्रकार गेल्या दोन वर्षात चालू झाले असून गडकिल्ल्यांचे पावित्र्य नष्ट करण्याचे प्रयत्न रोखण्यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांची दक्षता समिती स्थापन करत असल्याची घोषणाही त्यांनी केली.

छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक होते. त्यांच्यामुळे आज हिंदू समाज अस्तित्वात आहे. तरीही सध्याच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणाच्या सोईने शिवाजी महाराजांचे चरित्र सांगण्याचा घातक प्रयत्न सुरू झाला आहे. त्यातूनच राज्यातील विविध गडकिल्ल्यांवर विशिष्ट धर्माची स्थाने निर्माण करण्यात येत आहेत, असे पाटील म्हणाले.

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी किल्ले रायगड येथे मदार मोर्चा येथे रंगरंगोटी करून आणि चादर चढवून त्याचे प्रार्थनास्थळ करण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले. त्याच्या विरोधात छत्रपती खासदार संभाजीराजे यांनी पुरातत्व खात्याकडे पत्र पाठवून कारवाईची मागणी केली. विशेष म्हणजे स्थानिक शिवसेना आमदारांनी या विषयाकडे दुर्लक्ष केले. पण संभाजीराजे यांनी आवाज उठवला. दुर्दैवाने राज्यात ठिकठिकाणी गडकिल्ल्यांवर असे प्रकार घडू लागले आहेत.

शिवनेरी गडावर ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक सिद्दी इब्राहिम खान उद्यान’ असा फलक लावला गेला. रत्नागिरी जिल्ह्यात महामार्गावर ‘शिवाजी महाराजांचे गुरुवर्य पीरसाहेब यांच्या स्थानाकडे’ असा बोर्ड झळकला. या प्रकारांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रारी केल्या की पोलीस ऐतिहासिक पुरावा मागतात आणि तक्रार घेत नाहीत. ऐतिहासिक बाबींचे सरसकट कागदोपत्री पुरावे मिळू शकत नाहीत, याचा फायदा घेऊन महाविकास आघाडी सरकारच्या आशीर्वादाने आणि पोलिसांच्या मदतीने गडकिल्ल्यांचे पावित्र्य नष्ट करण्यात येत आहे, अशी टीका पाटील यांनी केली.

- Advertisement -

शिवसेनेने सत्तेसाठी हिंदुत्व सोडले आहे. तो पक्ष गडकिल्ल्यांचे पावित्र्य नष्ट करण्याकडे दुर्लक्ष करत असला तरी भाजप शिवरायांच्या इतिहासात बदल करणे सहन करणार नाही. त्यामुळेच आपण पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे एक दक्षता समिती स्थापन करत आहोत. ही समिती गडांना भेट देऊन गेल्या दोन वर्षात गडाचे पावित्र्य भंग करण्याचे कोणकोणते प्रयत्न झाले आहेत याची नोंद करेल आणि नंतर संपूर्ण पक्ष जनजागृती करून गडांचे पावित्र्य जपण्यासाठी संघर्ष करेल, अशी माहिती पाटील यांनी दिली.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांचे पावित्र्य जपण्यासाठी खासदार रणजितसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समिती नेमण्यात आली असून या समितीत सदस्य म्हणून खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे, माजी आमदार नितीनराजे शिंदे, भाजप सातारा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर महिला मोर्चा चिटणीस वर्षा डहाळे यांचा समावेश आहे. तर भाजपचे राष्ट्रीय सचिव सुनील देवधर हे समितीचे मार्गदर्शक असतील, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.


हेही वाचा : ठाकरे सरकारचे मंत्रिमंडळ बरखास्त करण्याची लोकायुक्त, राज्यपालांकडे मागणी करणार, चंद्रकांत पाटलांचे वक्तव्य

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -