शिवसेने नेते संजय राऊत यांनी आज सकाळी एक ट्विट केले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातातील राजदंड काय सांगतो की महाराष्ट्र धर्म म्हणजेच राजधर्माचे पालन, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले होते. या ट्विटवर भाष्य करताना संजय राऊत म्हणाले, ‘ज्यांच्या हातात राजदंड आहे त्यांनी राजधर्माचे पालन करावे. मुख्यमंत्र्यांना ट्विटची गरज नाही. ते राजधर्माचे पालन करत आहेत. सत्ताधारी असोत किंवा विरोधी पक्ष असो प्रत्येकाने राजधर्माचे पालन केले पाहिजे, असेही शिवसेने नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे. ‘छत्रपतींच्या राजधर्माचे पालन केले नाही तर हा देश, राज्य आणि समाज अडचणीत येतील. महाराष्ट्र धर्म हाच राजधर्म आहे असे मी मानतो, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.
— Sanjay Raut (@rautsanjay61) February 28, 2021
‘देशाच्या पंतप्रधानांवर टिका करणे, राज्याच्या राज्यपालांनी राजभवनात बसून राजकारण करणे, विधानसभा चालून न देण्याची विरोधी पक्षाची भूमिका हे राजधर्माच्या पलिकडे आहे. याला राजधर्माचे पालन करणे म्हणत नाही’, असे विधान संजय राऊत यांनी केले आहे.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांच्यावर अनेक टिका आणि वक्तव्य होत आहेत. त्यांच्या राजीनाम्याच्या अनेक चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. संजय राठोडांच्या राजीनाम्यावर राऊतांनी सूचक ट्विटही केले. मात्र ‘मी केलेले हे ट्विट हे सर्वव्यापक आणि सर्वसमावेश आहे’, असे राऊतांनी सांगितले. ‘मंत्रीमंडळात कोणाला ठेवायचे आणि कोणाला नाही हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. मुख्यमंत्र्यांच्या हातात राजधर्म आहे. ते कोणावरही अन्याय आणि न्याय करणार नाही असे स्पष्ट मत राऊतांनी मांडले. त्याचबरोबर मुख्यमंत्री कोणाच्या दबावाखाली नाही, असेही राऊत म्हणाले.