मुंबईतील कोरोनाची दररोजची वाढती आकडेवारी पाहता मुंबईचे महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल आणि महापौर किशोरी पेडणेकर यांनी काही स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यासोबतच राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीच्या निमित्ताने राजेश टोपे यांनीही काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेऊन मुख्यमंत्री येत्या दोन ते तीन दिवसात राज्यातील नागरिकांशी संवाद साधणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे मुंबईसह संपूर्ण राज्यात काय निर्णय घेण्यात येणार याचा निर्णय हा मुख्यमंत्रीच घेतील असेही संकेत महापौरांनी दिले आहेत.
मुंबईकरांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपायांचे पालन केले नाही, तसेच रूग्णसंख्या अशीच वाढत राहिली तर नाईलाजाने कठोर निर्बंध लादावे लागतील असा इशारा मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिला आहे. दुसऱ्या लाटेच्या दरम्यान एप्रिल महिन्यातही मुंबईतील दैनंदिन आकडा हा ११ हजारांच्या वर कधीही गेला नाही. उलट मुंबई नजीकच्या पुण्यात कमी लोकसंख्या असतानाही त्याठिकाणी रूग्णसंख्या १९ हजारांवर गेली. यापुढील दोन आठवडे आव्हानात्मक आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेतील दोन आठवडे उलटले आहेत. त्यामुळे ही लाट ओसरायला आणखी तीन ते चार आठवडे लागतील असेही ते म्हणाले. मुंबईतील परिस्थिती नियंत्रणात असून सध्या ३० बेड्स उपलब्ध आहेत. शिवाय अवघ्या १० टक्के रूग्णांनाच रूग्णालयात दाखल करण्याची तसेच ऑक्सिजनची गरज भासत असल्याचे ते म्हणाले.
मुंबईत इक्बाल सिंह चहल हे एकंदरीतच परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. आपल्याकडे विलगीकरण केंद्रे, रूग्णालये, गृह विलगीकरण सगळ्याच परिस्थितीवर महापालिका लक्ष ठेवून आहेत. त्यामुळेच कोरोना नियमाचे पालन केले तर लॉकडाऊनची वेळ येणार नाही, असेही ते म्हणाले. मुंबईकरांना लॉकडाऊन नकोय. पण केंद्राच्या नियमानुसार जर २० हजारांचा आकडा ओलांडला तर मात्र राज्य सरकार आणि महापालिका या नियमांची पूर्तता करेल.
कोरोना रूग्णसंख्या ही तीन ते चार पटीने वाढत असल्याचेही महापौरांनी स्पष्ट केले. त्यामुळेच मुख्यमंत्री येत्या दोन ते तीन दिवसात राज्यातील नागरिकांशी संवाद साधतील असेही त्यांनी सांगितले. राज्यात कोरोनाने अनेकांचे कंबरडे मोडले आहे. पण कुठेतरी अर्थव्यवस्था सावरत असतानाच पुन्हा एकदा लॉकडाऊनमुळे पुन्हा नवे संकट कोणालाही नकोय. कोरोनाने आधीच सगळ्यांचे कंबरडे मोडले असल्याचे महापौरांनी सांगितले.
काय म्हणाले आरोग्यमंत्री ?
राज्यातील कोरोना रूग्णांची आकडेवारी पाहिली तर ९० टक्के रूग्ण हे अवघ्या चार जिल्ह्यात आहेत. राज्यात सर्वाधिक रूग्ण हे एकट्या मुंबईत आहेत. त्यामुळेच उपलब्ध बेड्सपैकी ४० टक्के बेड्स भरले तर लॉकडाऊनचा विचार होऊ शकतो असे आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी स्पष्ट केले. राज्यातील साडेबारा हजार कोरोना रूग्णांपैकी ९ हजार रूग्ण हे मुंबईतले आहेत. त्यामुळे जिथे रूग्ण तिथेच लॉकडाऊन असे स्पष्टीकरण राजेश टोपेंनी दिले.