राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येमुळे आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण आला आहे. रुग्णसंख्या वाढली असल्याने राज्यात बेड, आयसीयू, रेमडेसिवीर, ऑक्सिजन पुरवठ्याबाबत कमतरता भासत आहे. ऑक्सिजन तुटवड्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना संपर्क करण्याचा प्रयत्न केला. परंतु पंतप्रधान कार्यालयाकडून मोदी पश्चिम बंगालच्या निवडणूकांमध्ये व्यस्त असल्याचे सांगितले गेले. तसेच पंतप्रधान मोदींचा मुख्यमंत्र्यांना अजूनही कोणताच संपर्क केला नाही.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पंतप्रधानांना पत्र लिहून सांगितले होते की, महाराष्ट्राला येत्या ३० एप्रिलपर्यंत दिवसाला १२०० मेट्रिक टन एवढी ऑक्सिजन लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेजारील राज्यांकडून हा ऑक्सिजन पुरवठा करण्यात यावा. तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत स्टील उत्पादन कंपनीत वापरला जाणारा ऑक्सिजन उपलब्ध केला जाऊ शकतो. याची परवानगी मागितली होती.
राज्यात कोरोनाच्या उद्रेकामुळे ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरचा मोठा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकार सध्या राज्याच्या बाहेरील उत्पादकांकडून आक्सिजनची मागणी करत आहे. तसेच अन्न व औषध प्रशासनाचे मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात पुढील दोन ते तीन दिवस रेमडेसिवीरची कमतरता राहिल मात्र पुढील काहिदिवसानंतर पुरवठा सुरळीत होईल.
महाराष्ट्र सरकारने रेमडेसिवीर औषधाच्या निर्यातीवर बंदी घातली असल्यामुळे निर्यातदारांनी राज्यात जास्तीत जास्त साठा विकला जावा अशी आपेक्षा व्यक्त केली आहे. तसेच राज्यातील ऑक्सिजनचा तुटवडा दूर करण्यासाठी महाराष्ट्रासह देशातील ११ राज्यांना ५० हजार मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवणार असल्याचे सांगितले आहे. त्यामध्ये महाराष्ट्र,मध्यप्रदेश,गुजरात,उत्तरप्रदेश,दिल्ही,छत्तीसगढ,कर्नाटक, केरळ, तमिळनाडू, पंजाब,हरयाणा आणि राजस्थान अशा राज्यांचा समावेश आहे.